Junnar: वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे जुन्नर तालुक्यात भात,कांदा, मका, द्राक्ष या पिकांसह उभ्या भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीची बांधावर जाऊन पाहणी केली आहे.भाजीपाला पिके व फळबागांच्या नुकसानीचे पंचनामे करून अहवाल तयार करण्याचे आदेश महसूल व कृषी विभागाला दिले आहेत. अशी माहिती आमदार अतुल बेनके यांनी दिली.
रविवारी रात्री तालुक्यात अवकाळी पाऊस झाला. पावसाच्या तडाख्यामुळे कांदा रोपे, नुकतीच लागवड केलेला कांदा, द्राक्ष, केळी, मका व भाजीपाला पिकांचे व आदिवासी भागात भात भिजल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. पावसाचा सर्वाधिक फटका कांदा,द्राक्ष बागा व भात पिकाला बसला आहे. आमदार बेनके यांनी झालेल्या नुकसानीची शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली.
याबाबत आमदार बेनके म्हणाले पावसाच्या तडाख्यामुळे द्राक्ष वेलीची पाने फाटली आहेत. फुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राजुरी भागात द्राक्षाचे घड खराब झाले आहेत. शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. बाजारभावाचा अभाव, पाणी टंचाई, वाढलेला भांडवली खर्च त्यामुळे शेती व्यवसाय अडचणीत असताना दरवर्षी अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शेतकऱ्यांवर अस्मानी संकट आले आहे.
शासनाने या नुकसानीचे वेगाने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्वरित द्यावी. अशी मागणी जिल्हाधिकारी व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत असे आदेश महसूल विभाग व कृषी विभागाला मी दिले आहेत.
कृषी अधिकारी व तहसीलदार यांनी मंडल निहाय पाहणी करण्याच्या सूचना गाव कामगार तलाठी, कृषी पर्यवेक्षक यांना दिल्या आहेत. पंचनाम्यापासून वंचित राहू नये म्हणून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी जागृत राहून आपल्या भागातील कृषी पर्यवेक्षक व गाव कामगार तलाठी यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन आमदार बेनके यांनी केले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.