Dhule Unseasonal Rain : धुळे जिल्ह्याला दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने झोडपले आहे. या पावसामुळे बागायतदार शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे. फळबागायत आणि भाजीपाला पिकाला याचा मोठा फटका बसला आहे. चाऱ्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खरिपात पावसाने मोठी दडी मारली. दुष्काळ घोषित झाला. ‘तवय वुना नयी येवर आते वना नुकसानले’ अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहेत.
यंदा खरिपाच्या पेरण्या उशिरा झाला. आषाढी एकादशीपासून पावसाला सुरवात झाली. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पेरण्या सुरू होत्या. त्यानंतर पावसाने दडी मारली. तब्बल ३५ दिवसांनंतर पाऊस झाला. (Unseasonal rains hit orchards and vegetable crops dhule news)
त्यानंतरही पावसात सातत्य राहिले नाही. उत्पादन ७० ते ८० टक्क्यांपर्यंत घटले. आता अवकाळीने फटका दिला आहे. शेतकऱ्यांचे विविध मार्गाने नुकसान सुरूच आहे. ‘दुस्कायमा तेरावा मयना’ असे म्हणत शेतकऱ्यांनी मनस्ताप व्यक्त केला आहे.
राज्य शासनाने दुष्काळ घोषित केला आहे. दुष्काळाच्या सवलती लागू झाल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारची मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्यातच पुन्हा अस्मानी संकट आले आहे. आता तरी प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांना मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
शेतकरी व शेतमजूर कधी दुष्काळी, कधी ओला दुष्काळी, तर कधी अवकाळीचा सामना करीत आहेत. शेतकरी विविध संकटांचा सामना करीतच आहेत. शासनही शेतकऱ्यांच्या पाठीशी नाही. अस्मानीसह सुलतानी संकटाचा सामना करावा लागत असल्याचे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गुलाबसिंग रघुवंशी, माजी जिल्हाध्यक्ष आत्माराम पाटील, शांतूभाई पटेल, भगवान पाटील, नारायण माळी, विश्वास देसले, मुराण्णा पाटील, राजेंद्र रमेश माळी आदींनी सांगितले.
"शेतकऱ्यांना हवामान बदलाचा वारंवार फटका बसत आहे. ठोस अंदाज व्यक्त करणारी यंत्रणाही कुचकामी ठरत आहे. अवकाळीने बोर, पपई, कांदा, भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान होते. आता शेतकऱ्यांनी कसे जगायचे, अशा प्रश्न वारंवार निर्माण होत आहे." -राजा पाटील, अध्यक्ष, शेतकरी विविध कार्यकारी सहकारी संस्था, कापडणे
आरावे येथे वीज पडून दोन गायी ठार
रविवारी (ता. २६) शिंदखेडा तालुक्यात सर्वत्र अवकाळी पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील आरावे येथे रविवारी दुपारी साडेचारला वीज पडून दोन गायी ठार झाल्या. तालुक्यातील दहा महसूल मंडळांपैकी दोंडाईचा मंडळात सर्वाधिक म्हणजे ४५ मिलिमीटर पाऊस झाला. सोमवारी (ता. २७)दुसऱ्या दिवशी सकाळी नऊला पावसाने हजेरी लावली. दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यामुळे गारठ्यात वाढ झाली. वातावरणातील बदलांमुळे उद्योग व्यवसायांवर परिणाम झाला.
आरावे (ता. शिंदखेडा) येथील मंगा हिलाल धनगर यांच्या गीर जातीच्या दोन गायी दुपारी साडेचारला शेतातील गोठ्यात परत येत असताना वीज पडून जागीच ठार झाल्या. त्यामुळे धनगर यांचे एक लाखाचे नुकसान झाले. संबंधित विभागाने त्वरित पंचनामा करावा अशी मागणी त्यांनी केली.
अवकाळीमुळे रब्बीवर रोगाचा प्रादुर्भाव वाढणार आहे. शिंदखेडा तालुक्यातील महसूल मंडळनिहाय झालेल्या अवकाळी पावसाची नोंद अशी ः
शिंदखेडा (३२ मिमी), चिमठाणे (३९ मिमी), नरडाणा (३० मिमी), वर्शी (४० मिमी), बेटावद (४२ मिमी), खलाणे (३८ मिमी), विरदेल (सात मिमी) सर्वात कमी पाऊस तर दोंडाईचा अपर तहसीलदार कार्यालयाअंतर्गत मंडळातील दोंडाईचा मंडळात ४५ मिमी, विखरण २८ मिमी, शेवाळे ३७ मिमी पाऊस झाला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.