

मुंबई-गोवा मार्ग अर्धवट;
तरीही टोलवसुली जोमात!
खारपाडा टोलनाक्यावरून कोकणवासीयांचा संताप
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई/अलिबाग, ता. १७ : गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण झालेले नाही. अनेक ठिकाणी कामे अर्धवट आहेत; मात्र तरीही राज्य सरकारने खारपाडा टोलनाका सुरू करून प्रवाशांच्या खिशाला कात्री लावण्यास सुरुवात केली आहे. अर्धवट पडलेले उड्डाणपूल, खराब रस्ते तसेच कोणत्याही मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. आतापर्यंत अपघातात शेकडो जणांनी प्राण गमावल्याने हा महामार्ग ‘मृत्यूचा मार्ग’ ठरला आहे. अशा धोकादायक परिस्थितीत टोल सुरू झाल्याने स्थानिक नागरिक, वाहनचालक आणि कोकणवासीयांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे.
पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्यातील खारपाडा टोलनाक्यामुळे मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आणि वारंवार मुदतवाढ देऊनही महामार्गावरील साईड पट्ट्या, उड्डाणपूल, अंडरपास, ड्रेनेज व्यवस्था, रुग्णवाहिका, तसेच चालकांसाठी स्वच्छतागृह, विश्रांतीकक्ष यासारख्या मूलभूत सुविधा पूर्ण झालेल्या नाहीत. अपूर्ण रस्ते, मोठमोठे खड्डे, धुळीचे साम्राज्य तसेच चुकीच्या नियोजनामुळे वाहनचालक प्रचंड हैराण आहेत. तरीही टोलवसुली सुरू झाल्याने या निर्णयाविरोधात राजकीय पक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झाले आहेत. प्रशासनाने १० दिवसांत आवश्यक सुविधा पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेने दिला आहे. शिवसेनेने (यूबीटी) रायगड जिल्ह्यातील ‘एमएच-०६’ आणि ‘एमएच-४६’ नोंदणी असलेल्या वाहनांना टोलमाफी देण्याची आणि महामार्गावरील फलक मराठीत लावण्याची जोरदार मागणी लावून धरल्यानंतर या स्थानिक वाहनांना टोलमधून सवलत देण्याचे प्रशासनाने मान्य केले आहे.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.