सिंहगडाच्या छत्रछायेत जगणाऱ्यांचा संसार उघड्यावर पडण्याची भीती!

House1.jpg
House1.jpg

किरकटवाडी (पुणे) :  तब्बल पाच पिढ्यांपासून राहत असलेली जागा खाली करण्याची नोटीस खानापूर वन परिमंडळ कार्यालयाकडून किल्ले सिंहगडावरील चार रहिवाशांना देण्यात आली. अगोदरच ते व्यवसाय बंद असल्याने हैराण आहेत. आता ते निवारा गमावण्याच्या चिंतेने हादरून गेले आहेत. तीन दिवसांत लेखी उत्तर सादर न केल्यास कारवाई केली जाईल, असा इशाराही वन विभागाकडून देण्यात आला आहे. 

अमोल पढेर, संजय गायकवाड यांच्यासह आणखी दोन रहिवाशांना वनविभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. सिंहगडावर पढेर, गायकवाड यांच्यासह इतरही अनेक परिवार वास्तव्यास आहेत. टिळक, आगरकर, आपटे, गांधी यांचे बंगले आहेत. जिल्हा परिषदेनेही शासकीय विश्रामगृह बांधलेले आहे. तसेच एका हॉटेल व्यावसायिकाने पक्के बांधकाम करत सुशोभीकरण केलेले आहे; मात्र यातील अनेक ठिकाणी सातबारा उताऱ्यावर असलेल्या जागेपेक्षा जास्त अतिक्रमण केलेले असताना त्यांना मात्र नोटीस देण्यात आलेली नाही. त्यामुळे वन विभागाची दुटप्पी भूमिका स्पष्ट दिसून येत आहे. पढेर, गायकवाड यांच्या पेक्षा जास्त इतर ठिकाणी सिंहगडावर मोठ्या प्रमाणात जागा सपाटीकरण करून बांधकाम करण्यात आलेले आहे, त्यामुळे तेथील वृक्षतोड होऊन वन्य प्राण्यांचा अधिवास संकटात येत नाही का? असा प्रश्न निर्माण होत आहे. 

अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असताना वनविभाग गप्प का?..... खडकवासला, डोणजे, खानापूर, मणेरवाडी, घेरा सिंहगड, मालखेड यांसह अनेक गावांच्या हद्दीत वनीकरण शेरा असलेल्या जागांवर मोठ-मोठे फार्म हाऊस, अलिशान बंगले, हॉटेल, लॉज उभे करण्यात आलेले आहेत. वन कायद्यानुसार सदर ठिकाणी असलेल्या बांधकाम परवानगी पेक्षा कित्येक पटीने जास्त बांधकाम करण्यात आलेले आहे; मात्र वनविभाग अशा धनदांडग्या व्यक्तींवर कोणत्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नाही. 
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आमच्या पाच पिढ्यांपासून आम्ही सिंहगडावर वास्तव्यास आहोत. सिंहगडाशिवाय इतर ठिकाणी दुसरा कुठलाही आधार आम्हाला नाही. 1962 सालापासूनचे जागेचे उतारे आमच्याकडे आहेत. जागा सपाटीकरण किंवा झाडे आम्ही तोडलेले नाहीत. उलट सिंहगडावरील कित्येक झाडे आम्ही जगवले आहेत. आहे त्या स्थितीत जागा आम्ही वापरत आहोत. वन विभागाने गरीब-श्रीमंत असा भेदभाव न करता सर्वांसाठी समान नियम ठेवावेत. 
-अमोल पढेर, रहिवासी, सिंहगड. 

संबंधितांकडे असलेली कागदपत्रे व त्यांचे लेखी म्हणणे भांबुर्डा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांसमोर मांडण्यास सांगण्यात आले आहे. उताऱ्यावर जेवढे क्षेत्र असेल त्यापेक्षा जास्त क्षेत्र आढळून आल्यास वन विभागाकडून ते ताब्यात घेतले जाणार आहे. 
- बाळासाहेब जिवडे, वनरक्षक, खानापूर वन परिमंडळ. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com