सनातन संस्थेवर कायमस्वरूपी बंदी घाला : अशोक चव्हाण

0ashok_chavan_36.jpg
0ashok_chavan_36.jpg

पुणे : नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, प्रा.कलबुर्गी आणि गौरी लंकेश हत्येप्रकरणी तपासाअंती सनातन संस्थेसह उपसंस्थांशी थेट संबंधित आरोपी सापडले आहेत. त्यांच्याविरोधात कारवाई करण्यास पाच वर्षांचा विलंब कसा काय लागला. कुठेतरी भाजपप्रणीत केंद्र व राज्यसरकारकडून यांना राजाश्रय तर दिला जात नाही ना अशी शंका येत आहे. दाभोळकरांच्या हत्येनंतर पुरावे सापडल्यानंतर केंद्रसरकारकडे सनातन संस्थेवर बंदीचा प्रस्ताव पाठवून देखील अद्याप त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप करीत सनातन संस्थेसह सर्व उपसंस्थांवर देखील कायमस्वरूपी बंदी घालावी, अशी मागणी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री, खासदार अशोक चव्हाण यांनी सोमवारी केली. 

कॉंग्रेस भवन येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्‍वजित कदम, महिला प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस, प्रवक्ते सचिन सावंत, शहराध्यक्ष रमेश बागवे आणि जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांच्यासह माजी आमदार व पदाधिकारी उपस्थित होते. 

प्रदेशाध्यक्ष चव्हाण म्हणाले,""सध्या देशात गोरक्षणाच्या नावाखाली हिंदुत्ववादी संघटना धुडगूस घालत आहेत. सनातन संस्थेचे साधक असलेल्या आरोपींना बॉंब, स्फोटके आणि पिस्तुलासह पकडण्यात आले आहेत. या सर्वांचा नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, प्रा.कलबुर्गी आणि गौरी लंकेश हत्येप्रकरणी संबंध असल्याचे पुरावे पोलिस प्रशासनाकडे आहेत. भाजपप्रणीत केंद्र व राज्यसरकारकडून कारवाई करण्यात जाणीवपूर्वक विलंब केला जात असल्याचा संशय येत आहे. त्यांना राजाश्रय तर दिला जात नाही ना, अशी शंका निर्माण होत आहे. हा तपास शेवटपर्यंत होईल का याबाबत आम्हाला शंका आहे. नाशिक मालेगाव बॉंबस्फोटाचे आरोपी जसे सुटले तसे हे सुटू नये, अशी आमची अपेक्षा आहे. धर्मनिरपेक्षता, सामाजिक एकात्मता आणि लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे देशविरोधी कृत्य करणाऱ्या सनातनसह उपसंस्थांवर सक्तीने कारवाई करून कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी अशी आमची मागणी आहे.'' 

31 ऑगस्टपासून जनसंघर्ष यात्रा 
पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये केंद्र व राज्यसरकारच्या थापेबाजी, खोटी आश्‍वासने आणि जाहिरातबाजीचा पर्दाफाश करण्यासाठी जनसंघर्ष यात्रा काढण्यात येणार आहे. 31 ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथील श्री तीर्थक्षेत्र अंबाबाई मंदिरात दर्शन घेऊन या यात्रेला सुरवात होणार असून 7 किंवा 8 सप्टेंबर रोजी पुण्यात समारोप केला जाईल, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी यावेळी दिली. 

अशोक चव्हाण नेमके काय म्हणाले, 
- मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षणामध्ये वेळकाढूपणा 
- चार वर्षांत केवळ खोटी आश्‍वासने आणि फसव्या घोषणा 
- लोकांऐवजी मोजक्‍या उद्योगपतींचा विकास 
- घटनात्मक संस्थांचे अवमूल्यन 
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधितांची प्रमुखपदांवर नियुक्‍त्या 
- सरकारविरोधी प्रसारमाध्यमांवर निर्बंध 
- संपादक व पत्रकारांच्या नोकऱ्या घालविण्यासाठी दबाव 
- केंद्र व राज्यसरकारविरोधात जनसंघर्ष यात्रा 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com