पुणे - पुणेकरांना समान व शुध्द पाणी पुरविण्याकरिता आखलेल्या योजनेतर्गंत पाणीपट्टीत 15 टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी मंजूर झाला. ही वाढ पुढील आर्थिक वर्षापासून लागू होईल. नव्या निर्णयानुसार पुणेकरांना वर्षाकाठी दीड ते चार हजार रुपये मोजावे लागणार आहेत. दुसरीकडे, लोकांना रोज अपुरे पाणी मिळत आहेत, समान पाणीपुरवठा योजनेला गती नसल्याने पाणीपट्टीत वाढ करू नये, असा आग्रह सदस्यांनी धरला.
समान पाणीपुरवठा योजनेसाठी मागील वर्षापासून पाच टप्प्यांत पाणीपट्टीत वाढ करण्याचा निर्णय महापालिकेने 2016 मध्ये घेतला आहे. त्यानुसार पहिल्या वर्षी 12 टक्के, पुढील चार वर्षे प्रत्येकी 15 टक्के वाढ करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील वाढीनंतर आता दुसऱ्या टप्प्यात म्हणजे, पुढील वर्षापासून पाणीपट्टीत 15 टक्के वाढीची सूचना महापालिका आयुक्तांनी प्रारुप अर्थसंकल्पात (2020-21) केली आहे. त्यावर खास सभेत चर्चा झाली. तित, पाणीपट्टीत वाढ करण्याचा निर्णय एकमताने घेतला. दरम्यान, पाणीपुरवठा सुरळीत करण्याची सूचना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली, तर, यासंदर्भात स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृहनेते धीरज घाटे, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, शिवसेनेचे पृथ्वीराज सुतार, वसंत मोरे आदींची भाषणे झाली. दरम्यान, पाणीपट्टीपाठोपाठ मिळकतकरातील 12 टक्के वाढीचा प्रशासनाचा प्रस्ताव स्थायी समितीने पंधरा दिवसांपूर्वीच फेटाळला आहे.
नव्या गावांसाठीही विरोध
शहरात सर्वत्र पुढील आर्थिक वर्षात पाणीपट्टीतील 15 टक्के वाढ होणार आहे. मात्र, नव्या गावांमधील लोकांना टॅंकरद्वारेही पुरेसे पाणी मिळत नाही. या गावांत योजनेचे काम कधी होणार आहे, हे ठाऊक नसल्याने नव्या गावांसाठी पाणीपट्टी लागू करू नये, अशी अपेक्षाही सदस्यांनी व्यक्त केली. तसेच, उपनगरांमधील काही भागांत अपुरे पाणी मिळत असल्याने जादा पाणीपट्टी का द्यायची, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.