पुण्यात मेट्रोच्या कामाची धडकी; वाहनचालक, पादचाऱ्यांचा जीव मुठीत 

पुण्यात मेट्रोच्या कामाची धडकी; वाहनचालक, पादचाऱ्यांचा जीव मुठीत 

पुणे  - वर्दळीच्या कर्वे रस्त्यावर सुरू असलेल्या मेट्रो मार्गाच्या कामामुळे तेथून ये-जा करणारे हजारो वाहनचालक, पादचाऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. बांधकाम सुरू असताना मेट्रोकडून सुरक्षिततेच्या निकषांचे पालन केले जात नसल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. तर, सर्व काळजी घेत असल्याचा दावा महामेट्रोचा दावा आहे. 

कर्वे रस्त्यावर मेट्रोच्या खांबांची उभारणी पूर्ण झाली आहे. त्यावर आता गर्डर टाकण्यात येत आहेत. यासाठी अनेकदा लोखंडी खांब व संबंधित साहित्य सुमारे 12 ते 16 मीटर उंचीवर ठेवण्यात येते; परंतु, त्या खाली जाळ्या नसल्यामुळे ते साहित्य खाली पाडले जाते. गेल्या दोन महिन्यांत तीन घटनांमध्ये लोखंडी खांब रस्त्यावरील वाहनांवर कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे बांधकाम ठेकेदाराला महामेट्रोने सुमारे एक लाख रुपयांचा दंडही केला आहे. तसेच ज्या नागरिकाच्या मोटारीचे नुकसान झाले आहे, त्याला नुकसान भरपाईही देण्यात आली. दोन दिवसांपूर्वीही कर्वे रस्त्यावर सुमारे 15 मीटर उंचीवरून पहार रस्त्यावर पडली. सुदैवाने तेथून पादचारी अथवा कोणते वाहन गेले नव्हते. अन्यथा गंभीर घटना घडली असती. महापालिकेच्या नियमानुसार इमारतीचे बांधकाम सुरू असताना त्या खाली जाळी (नेट) लावणे बंधनकारक आहे. हे काम रस्त्यावर सुरू असेल तर, ते अत्यावश्‍यक आहे. जाळी नसल्यास संबंधित बांधकाम व्यावसायिकाला महापालिकेचे अधिकारी दंड ठोठावतात; परंतु, मेट्रोसाठी हे नियम शिथिल केले आहेत का, असा प्रश्‍न नागरिकांनी उपस्थित केला आहे. 

या बाबत परिसरातील रहिवासी संजय देशपांडे म्हणाले, ""मेट्रो मार्गासाठी बांधकामाचे नियम आहेत का? वनाज ते आनंदनगर दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा कोठेही पदपथ शिल्लक राहिलेले नाहीत. तसेच मेट्रोच्या स्थानकांचे काम सुरू असताना, त्या खालून जाणाऱ्या पादचाऱ्यांची सुरक्षितता जोपासण्यासाठी कोणत्याही उपायोयजना केलेल्या नाहीत. वाहनांवरून जातानाही नागरिकांच्या मनात भीती असते.'' काम सुरू असल्याची चिन्हे, बॅरिकेड अत्यावश्‍यक आहेत. त्यांचाही वापर होताना दिसत नाही, असेही त्यांनी सांगितले. 

रहिवासी संजय भावे म्हणाले, ""मेट्रो स्थानकासाठी आनंदनगरजवळ खांब उभारण्याचे काम सुरू झाले; परंतु, तीन महिन्यानंतरही त्यात काही प्रगती झालेली नाही. मेट्रोसाठी खड्डे खोदून ठेवले जातात; परंतु, त्याच्या बाजूला जाळी, बॅरिकेड लावणे आदी उपाययोजनाही केल्या जात नाहीत.'' या बाबत महामेट्रोकडे तक्रार केली तरी दखल घेण्यात आली नाही, असाही अनुभव त्यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितला. 

मेट्रो मार्गाचे काम सुरू असताना, जाळी लावण्याच्या सूचना ठेकेदाराला दिल्या आहेत. तसेच नियमांचे त्याने उल्लंघन केल्यामुळे त्याला दोन वेळा दंडही झाला आहे. याबाबत पुन्हा सूचना देण्यात येतील. नागरिकांच्या काही तक्रारी असतील, तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. 
- अतुल गाडगीळ, प्रकल्प संचालक, महामेट्रो 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com