

पुणे, ता. २६ : नसरापूर येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व हत्येप्रकरणी पोलिसांनी अत्यंत प्रभावीपणे पद्धतीने तपास करून भक्कम पुरावे न्यायालयासमोर मांडले. त्यामुळे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरविले असून या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी, अशी राज्य सरकारची भूमिका आहे. न्यायालयही ही मागणी मान्य करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
पुण्यातील छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) मुख्यालयाला भेट दिल्यानंतर फडणवीस यांनी
पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘नसरापूर प्रकरणात पोलिसांनी अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने तपास केला. सरकारी वकिलांनीही न्यायालयात प्रभावीपणे बाजू मांडली. सर्व पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरविले आहे. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर खटल्याची सुनावणी किती वेगाने पूर्ण करायची, हे न्यायालयाच्या अधिकारात असते. न्यायालयाने सुट्टीच्या काळातही या खटल्याची सुनावणी घेत रेकॉर्ड वेळेत प्रक्रिया पूर्ण केली. भविष्यात अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये तातडीने न्याय मिळू शकतो, याचा हा आदर्श ठरेल.’’
लोहगड परिसरातील तरुणाच्या हत्येच्या घटनेवर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, ‘‘ही अत्यंत धक्कादायक आणि अनाकलनीय घटना आहे. चांगल्या कुटुंबातील, शिकलेल्या तरुणामध्ये अशी सूडबुद्धी का निर्माण होते, याचा समाज म्हणून विचार करण्याची गरज आहे. या घटनेकडे केवळ गुन्हेगारीच्या दृष्टीने न पाहता सामाजिक दृष्टिकोनातूनही कारणांचा शोध घेणे आवश्यक आहे. अशा घटना टाळण्यासाठी समाजात अधिक सक्षम व्यवस्था उभी करण्याची गरज आहे.’’
दरम्यान, फडणवीस यांनी यावेळी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून ‘सारथी’च्या विविध विभागांची पाहणी करून विविध उपक्रमांची माहिती घेतली. संस्थेने सरकारकडे सादर केलेल्या विविध प्रस्तावांना मंजुरी दिली जाईल, अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.
-----------------