पुणे- मुंबईकरांनो तुमचं बरोबर, पण त्यांचंही चूक नाही ! 

pune mumbai
pune mumbai

पुणे व मुंबईत कोरोनाचा कहर झाल्याने गावाकडे गेलेले बरे, म्हणून शहरातील मंडळी गावाकडे जात आहे. तर गावात कोरोना नव्हता, पण यांच्यामुळे त्याचा शिरकाव झाला, असा आरोप गावाकडील मंडळी शहरातून आलेल्यांवर करत आहेत. यातून सध्या बरेच वाद निर्माण होत आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासन व पोलिसांची डोकेदुखीही वाढली आहे. 

सध्या सगळीकडे एकच शब्द ऐकायला मिळत आहे आणि तो म्हणजे कोरोना. पुणे व मुंबईत तर कोरोनाबाधितांची संख्या वाढतेच आहे. यामुळे या दोन्ही शहरांतील लोक जेवढे घाबरलेले नाहीत, त्याहून अधिक घाबरलेले आहेत गावाकडचे लोक. कारण आपल्या घरातलेच पण पुणे- मुंबईत राहणारे जवळचे नातलग गावाकडे आले तर काय करायचे, असा मोठा प्रश्‍न त्यांना पडला आहे.

रात्री- अपरात्री आडमार्गाने गावात शिरण्याचा प्रयत्न ही मंडळी करतात. त्यांना घरात ठेवले तर गावचा रोष, नाही घेतले तर त्यांनी जावे कोठे, या अडचणीत गावकडची मंडळी अडकली आहेत. पुणे जिल्ह्यातील बऱ्याच गावांमध्ये कोरोना रुग्ण सापडले आहेत, त्यातील बरेच एक तर शहरातून आलेले आहेत किंवा त्यांच्यापासून बाधा झालेले आहेत. घरात क्वारंटाइन केलेले गावभर फिरतात, अशा तक्रारी आहेत. त्यामुळे गावकऱ्यांची काळजी घ्यायची की, गावात आलेल्यांची, या द्विधा मनःस्थितीत स्थानिक प्रशासन आहे. 

दुसरीकडे, गावात मंदिर बांधायचे, जीर्णोद्धार करायचा, शेततळे, बंधारा बांधायचा, शाळा उभारायची, शहरात मुलांच्या शिक्षणासाठी व्यवस्था करायची, अशा वेळी हक्काने आमच्याकडे येणारे आता आम्हाला गावचे रस्ते बंद करतात, अशी भावना शहरी मंडळींमध्ये निर्माण झाली आहे. गाव आमचंही आहे, मग रोखता कशाला, असा प्रश्‍नही उपस्थित केला जात आहे. यातूनच वादाला तोंड फुटत आहे. या सर्व गोष्टींचा विचार केल्यास गावची मंडळी व गावाकडे आलेली शहरी मंडळी आपापल्या ठिकाणी बरोबर आहेत.

दोघांच्याही भावनांचा आदर करायलाच हवा. पण, प्रश्‍न आहे तो गावात राहणाऱ्या व येणाऱ्यांच्या आरोग्याचा. जिल्ह्यात सापडलेले बहुतांश रुग्ण शहरातून आलेले किंवा त्यांच्यापासून बाधा झालेले आहेत. याचा विचार शहरी लोकांनी गावाकडे जाताना करणे गरजेचे आहे. पुणे- मुंबईत लाखोंच्या संख्येने लोक राहतातच की.... ते शहर सोडून गेले नाहीत. आहे त्या परिस्थितीला सामोरे जाऊन स्वतःची काळजी घेत त्यांची दैनंदिनी सुरू आहे. ज्यांना जाण्यासाठी गावही नाही, त्यांनी काय करायचे? 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

गाव तुमचे आहे, तसे शहरही तुमचेच आहे. जसे मोठे होईपर्यंत गावाने भरपूर दिलं, तसे शहरांनीही तुम्हाला भरपूर काही दिले आहे. तुम्ही शहरात आहात याचा गावाकडच्या मंडळींनाही अभिमान नक्कीच आहे. याचा अनुभव तुम्हाला अनेक वेळा आला असेलच. मग शहराला घाबरून असे किती दिवस गावाकडे राहणार? कधी ना कधी जावंच लागणार ना शहराकडे? गावाकडच्या मंडळींनी गाव सांभाळला, आता गावाचे आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी शहरी मंडळींची आहे. त्यामुळे मनात राग न आणता गावच्या मंडळींच्या भावना समजून घ्या. 


कृपया लक्षात ठेवा... 
- गावाकडे आला आहात तर प्रशासनाने लागू केलेल्या नियम व अटींचे पालन करा - गावात येण्यापूर्वी आरोग्य तपासणीची व्यवस्था केली आहे, ती करून घ्या 
- होम क्वारंटाइन केले असल्यास घरातच राहा 
- काही होत नाही, ही वृत्ती सोडून द्या 
- वाद घालून गावचे वातावरण बिघडवू नका 
- गावकऱ्यांनीही शहरी मंडळींकडे आरोपीच्या नजरेतून बघू नये 
- एकमेकांचा विचार करण्यापेक्षा गावाचा विचार करा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com