'पुढच्या पिढ्यांसाठी अढळ दीपस्तंभ म्हणून डॉ.बाबा आढाव यांच्याकडे पाहीले जाते. त्यांना कायम पाठींबा देण्याचे काम त्यांच्या पत्नी शीला आढाव यांनी केले.
पुणे - 'पुढच्या पिढ्यांसाठी अढळ दीपस्तंभ म्हणून डॉ. बाबा आढाव यांच्याकडे पाहीले जाते. त्यांना कायम पाठींबा देण्याचे काम त्यांच्या पत्नी शीला आढाव यांनी केले. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने ज्या व्रतस्थपणे काम केले, तोच वारसा डॉ. बाबा आढाव व शीला आढाव या दाम्पत्याने पुढे सुरु ठेवला.' असे मत राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी मंगळवारी व्यक्त केले.
ग्रॅव्हिटस् फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा पहिला 'जीवन गौरव पुरस्कार' शीला आढाव यांना मंगळवारी डॉ. मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी डॉ. बाबा आढाव, सामाजिक कार्यकर्त्या वसुधा सरदार, सिंबायोसिस संस्थेच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, पत्रकार प्रतिमा जोशी, माजी खासदार संजय काकडे, फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे उपस्थित होत्या. रोख रक्कम, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
डॉ. मोरे म्हणाले, 'आढाव दाम्पत्याचे महाराष्ट्रावर मोठे ऋण आहेत. त्याची पोचपावती या कार्यक्रमादारे त्यांना मिळाली आहे.जनता पक्षाचा प्रयोग झाला, त्यावेळी बाबांसमवेतच्या अनेकांनी राजकारणात प्रवेश केला, ते मोठेही झाले. बाबांनाही आमदार, खासदार, मंत्री होता आले असते. मात्र त्यांनी मोह टाळत सत्यशोधक चळवळीचा वसा पुढे नेला. शीलाताई देखील मोहाला बळी पडल्या नाहीत. म्हणूनच आढाव दाम्पत्य आपल्यासाठी आदर्श आहे.'
डॉ.बाबा आढाव म्हणाले, 'आम्ही राजकारणात परिवर्तनाची भाषा बोलतो. पण त्यामुळे समाज, माणसे किती बदलतात. माझ्या विचारांमध्ये शीला दोन पावले पुढे आहे. उषा काकडे यांच्यामुळे शीलाला दाद मिळाली. हि दाद एखाद्या मोठ्या उभारणीत होण्याची आता गरज आहे.'
शीला आढाव यांनी पुरस्काराबद्दल कृतज्ज्ञता व्यक्त केली. त्या म्हणाल्या, 'माझ्यासाठी हा पुरस्कार म्हणजे माहेरची भेट आहे. आज माझा सन्मान बाबांच्या उपस्थितीत होत आहे, याचे नवल वाटते. माझे वडील नास्तिक होते, त्यांनी अंधश्रद्धा, जातीपातीला कधी थारा दिला नाही. आईने तर महिलांवरील अन्यायाला वाचा फोडली. त्यांचे व राष्ट्र सेवा दलाचे संस्कार आमच्यावर झाले होते. नोकरीचा काळ कष्टाचा होता. बाबांबरोबर लग्नाचा निर्णय चुकला नाही. आम्हा दोघांचे वय वाढली, मात्र उत्साह आजही कायम आहे. आमची जीवनयात्रा एक आनंद यात्राच आहे.'
संजय काकडे म्हणाले, 'प्रत्येक महापुरुषाच्या मागे स्त्रीयांचे योगदान मोलाचे आहे. बाबा आढाव यांनी कष्टकऱ्यांना न्याय दिला. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या शीला आढाव यांचा सन्मान हा आमचाच गौरव आहे.' डॉ. विद्या येरवडेकर, माधुरी ठोंबरे, अनिता भोसले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे यांनी केले. तर सूत्रसंचालन दीपक म्हस्के यांनी केले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.