Pune Water Supply : पुणेकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार; काटकसर करण्याचं नागरिकांना आवाहन

यंदा पावसाचे प्रमाण कमी असण्याची शक्यता आहे.
water supply
water supplyesakal

पुणे, ता. ११ : एल निनोच्या प्रभावामुळे जून जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण कमी असण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम धरण साठ्यावर होणार आहे. त्यामुळे पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाण्याचा वापर काटकसरीने करा, पर्यायी जलस्त्रोतांची व्यवस्था याचा कृती आराखडा राज्य शासनाला सादर करण्याच्या सूचना राज्य शासनाकडून देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, खडकवासला धरण प्रकल्पात सध्या १३.१० टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून, त्यापैकी महापालिकेला आॅगस्ट अखेर पर्यंत ७.९० टीएमसी पाणी लागणार आहे. बाष्फीभवन, सिंचन याचा विचार करता धरणात पुरेसा पाणी साठा नसले तर पुणेकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार असणार आहे.

water supply
Sharad Pawar : "उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देताना सहकारी पक्षांना विचारात घेतलं नाही"

राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी आज राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पाणी पुरवठा, धरणातील पाणी साठ्याचे नियोजन यासंदर्भात आॅनलाइन बैठक घेतली. त्यामध्ये महापालिकेचे अधिकारीही सहभागी झाले. या बैठकीत मॉन्सूनच्या प्रवासात ‘एल निनो’चा अडथळा निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

त्यामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी असण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम शहरातील पाणी पुरवठ्यावर होणार असल्याने आत्तापासूनच त्यासंदर्भातील नियोजन पाटबंधारे विभाग आणि महापालिकांनी करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच पाण्यासाठी बोअर, विहिरी यासह इतर पर्यायी जलस्रोतांचे नियोजनही करावे अशी सूचना देण्यात आली आहे.

water supply
Maharashtra Politics : महाविकास आघाडीची चाल बिघडली? उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर

गेल्याच महिन्यात पुणे महापालिका आणि पाटबंधारे विभागाने ‘एल निनो’च्या पार्श्‍वभूमीवर बैठक घेऊन पाण्याच्या नियोजनासाठी चर्चा केली. त्याचा अंतिम निर्णय एप्रिल महिन्यात होणाऱ्या कालवा समितीच्या बैठकीमध्ये होईल असे सांगण्यात आले होते. पण राज्य शासनानेच आज बैठक घेऊन काटकसरीने पाणी वापरा अशी सूचना दिल्याने प्रशासकीय हालचालींना वेग येणार आहे.

याचे नियोजन करावे लागणार

  • - शहरातील विहिरी, बोअर याची माहिती संकलित करणे

  • - समाविष्ट गावांसह ज्या भागात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे तेथे पाण्याची व्यवस्था करणे

  • - सध्याचे टँकर प्वाइंट, नव्याने टँकर प्वाइंट निर्माण करणे, किती टँकर लागणार याचा आढावा घेणे

  • - आवश्‍यक तेथे पाण्याचे साठे अधिग्रहण करणार

  • - महापालिकेच्या पाणी पुरवठा यंत्रणेतील पाण्याची गळती कमी करणे

  • - एका आठवड्यात कृती आराखडा तयार होणार

water supply
Supreme Court : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

असे आहे पाण्याचे गणित

खडकवासला धरण प्रकल्पात आज (ता. ११) १३.१० टीएमसी पाणी साठा असून, गेल्‍यावर्षी ११ एप्रिल रोजी देखील १३.१० टीएमसी पाणी शिल्लक होते. बाष्फीभवनामुळे यातील २ टीएमसी पाणी धरणातून कमी होणार आहे. खडकवासला धरण प्रकल्पातून महापालिका रोज १४७० एमएलडी पाणी उचलत आहे.

याच प्रमाणे ३१ आॅगस्ट पर्यत पाणी घेतल्यास ७.९० टीएमसी पाण्याची आवश्‍यकता भासणार आहे. त्यामुळे धरणात केवळ ३.२ टीएमसी पाणी शिल्लक राहणार आहे. शेतीच्या उन्हाळी आवर्तनासाठी किमान चार टीएमसी पाणी आवश्‍यक आहे. त्यामुळे शेतीला पाणी कमी पडू शकते, त्यादृष्टीने भविष्याचे नियोजन करावे लागणार आहे.

‘‘पावसाने ओढ दिली तर या काळात शहरात पाणी पुरवठा करणे, ज्या भागात टंचाई आहे तेथे पाणी कसे उपलब्ध करून देता येईल याचे नियोजन करण्यासाठी कृती आराखडा तयार करून तो शासनाला सादर करण्याचे आदेश आजच्या बैठकीत देण्यात आले आहेत. एका आठवड्यात हा आराखडा शासनाला सादर केला जाईल.’’, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आय़ुक्त रवींद्र बिनवडे यांनी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com