प्रकाशन संस्थांची क्रमवारी जाहीर केल्यास पुस्तकांची गुणवत्ता टिकून राहील

सर्वोत्कृष्ट विद्यापीठांसाठी ज्याप्रमाणे राष्ट्रीय क्रमवारी जाहीर केली जाते, त्याच धर्तीवर दर्जेदार प्रकाशन संस्थांची क्रमवारी जाहीर केल्यास पुस्तकांची गुणवत्ता टिकून राहील.
Books
Bookssakal
Summary

सर्वोत्कृष्ट विद्यापीठांसाठी ज्याप्रमाणे राष्ट्रीय क्रमवारी जाहीर केली जाते, त्याच धर्तीवर दर्जेदार प्रकाशन संस्थांची क्रमवारी जाहीर केल्यास पुस्तकांची गुणवत्ता टिकून राहील.

- महिमा ठोंबरे

पुणे - सर्वोत्कृष्ट विद्यापीठांसाठी ज्याप्रमाणे राष्ट्रीय क्रमवारी जाहीर केली जाते, त्याच धर्तीवर दर्जेदार प्रकाशन संस्थांची क्रमवारी जाहीर केल्यास पुस्तकांची गुणवत्ता टिकून राहील. प्रकाशन व्यवसायासह वाचकांनाही त्याचा फायदा होईल, असे मत साहित्य क्षेत्रांतील तज्ज्ञांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले. मात्र, त्यासाठी योग्य निकष निश्चित केले जावे. तसेच, सरकारने स्वतः अथवा एखाद्या त्रयस्थ व निष्पक्ष संस्थेमार्फत ही क्रमवारी जाहीर करावी, असेही ते म्हणाले.

भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांनी पुण्यात नुकत्याच एका कार्यक्रमात बोलताना ‘महाविद्यालये, विद्यापीठे यांची विविध निकषांच्या आधारे ज्याप्रकारे क्रमवारी जाहीर केली जाते, त्याचप्रमाणे प्रकाशन संस्थांचीही क्रमवारी जाहीर करण्यात यावी’, असा प्रस्ताव मांडला होता. याबाबत विविध प्रकाशन संस्थांचे प्रमुख तसेच साहित्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी वरील मते व्यक्त केली.

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष व दिलीपराज प्रकाशनाचे संचालक राजीव बर्वे म्हणाले, ‘क्रमवारीची कल्पना स्वागतार्ह आहे. मात्र, क्रमवारी जाहीर करणारी संस्था निष्पक्ष आणि सर्वमान्य असावी. सरकारने स्वतः पुढाकार घेतल्यास उत्तम. किंवा सरकारने तज्ज्ञांची समिती नेमल्यास त्यामार्फत हे करता येईल.’ मनोविकास प्रकाशनाचे अरविंद पाटकर म्हणाले, ‘विनय सहस्त्रबुद्धे यांनी मांडलेली सूचना चांगली आहे. मात्र, ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सरकारनेच पुढाकार घ्यायला हवा. तरच या क्रमवारीला मूर्त आणि ठोस स्वरूप मिळू शकेल.’

हे असू शकतात निकष

  • संपादनाची व्यवस्था व प्रक्रिया

  • आर्थिक व्यवहारातील पारदर्शकता

  • पुस्तकांची निर्मितीमूल्ये (छपाई, मुद्रितशोधन, आराखडा)

  • प्रकाशन संस्थेचा इतिहास

  • संस्थेला मिळालेले पुरस्कार

  • पुस्तकांची लोकप्रियता

  • विषयांमधील वैविध्य

स्पर्धेच्या युगात टिकून राहण्याची गुणवत्ता हाच एक निकष आहे. त्यामुळे गुणवत्तेबाबत तडजोड करायची नाही, अशी मानसिकता निर्माण करायची असेल तर क्रमवारीसारख्या उपक्रमांचे स्वागत केले पाहिजे. वाचकांना चांगल्या गुणवत्तेची पुस्तके मिळणे, हा त्यांचा अधिकार आहे. तो अबाधित राखला जावा आणि एकूण साहित्य व्यवहाराची गुणवत्ता सुधारावी, यासाठी अशा उपक्रमांचे स्वागत केले पाहिजे.

- प्रा. मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद

प्रकाशकांची क्रमवारी जाहीर करायची असल्यास मान्यताप्राप्त संस्थेकडून पाहणी करून ते व्हायला हवे. त्याचे योग्य निकष निश्चित व्हायला हवेत, तरच वाचकांना त्यातून काही दिशादर्शन होऊ शकेल आणि प्रकाशकही त्याला मान्यता देतील.

- दिलीप माजगावकर, संचालक, राजहंस प्रकाशन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com