
राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता : आमदार रोहित पवार
नारायणगाव : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका व मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता आहे. राज्यात आपल्या विचाराचे सरकार आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे.असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केले.
आमदार अतुल बेनके यांच्या वाढदिवसा निमित्त कांदळी औद्योगिक वसाहत येथे अभिष्टचिंतन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वाढदिवसा निमित्त वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना सायकल व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार रोहित पवार होते. या वेळी जिल्हा बँकेचे संचालक संजय काळे,विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल मेहेर गणपतराव फुलावडे,उद्योजक किशोर दांगट , विनायक तांबे, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार , शरद लेंडे, विवेक वळसे पाटील , देवराम लांडे , अंकुश आमले, मोहित ढमाले, विकास दरेकर , तानाजी डेरे, सरपंच विक्रम भोर, उज्वला शेवाळे, सुरेखा वेठेकर, अनघा घोडके आदी मान्यवर उपस्थित होते
आमदार पवार म्हणाले मागच्या पिढीने आम्हाला जमिनीवर व लोकांमध्ये राहून काम करण्याची शिकवण दिली आहे. राजकारणात सन २०२४ नंतरचा काळ हा युवकांचा असणार आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निर्णय सुद्धा युवकच घेणार आहेत. राजकारणात येताना मी खूप पुढचा विचार करुन आलोय. पदासाठी नाही मात्र महाराष्ट्रासाठी काम करायचं आहे. राजकारण करत असताना सहकारी मित्र आमदार बेनके यांना कधीच विसरणार नाही.
आमदार अतुल बेनके हे सदैव युवा पिढी, महिला, जेष्ठांच्या उन्नतीचा विचार करतात. पाच कोटी रुपये खर्च करून ते जुन्नर तालुक्यातील युवकांसाठी अद्यावत क्रीडा संकुल उभारणार आहेत. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज ५ हजार ५५५ वृक्षारोपण करण्यात आले. आगामी निवडणुकीत त्यांना ५५ हजाराच्या मताधिक्याने विजयी करा.या साठी विघ्नहरचे अध्यक्ष शेरकर व माजी सभापती काळे यांची त्यांना साथ राहिल.
आमदार बेनके म्हणाले माजी आमदार वल्लभ बेनके यांनी विकासाचा पाया रचला आहे. शरद पवार यांचा विचार घेऊन आम्ही विकासाचे काम करत आहोत. सध्या राजकीय परिस्थिती बिघडली आहे. कितीही प्रलीभने आली तरी मी नीतिमत्ता , पक्ष निष्ठा ढासळून देणार नाही.जनेतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. सर्व सामान्य जनतेला माझ्या हृदयात स्थान असून त्यांच्या सेवेसाठीच अखेर पर्यंत काम करत राहणार आहे.
विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष शेरकर म्हणाले याची आडवा याची जिरवा या पद्धतीने राजकारण सुरू राहिल्यास कार्यकर्त्यांनी काय करायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांची विचारधारा एकच आहे. आमचे तात्विक मतभेद असले तरी आमदार अतुल बेनके यांना आमची सहकार्य करण्याची भूमिका राहिली आहे.
काळे म्हणाले आमदार अतुल बेनके हे विकासाचे व सर्वसामान्यांच्या हिताचे राजकारण करत आहे. २०२४ नंतर राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येणार असून अतुल बेनके हे पुन्हा आमदार होतील.सुत्रसंचालन संतोष ढोबळे यांनी केले.कार्यक्रमाचे नियोजन युवा नेते अमित बेनके, तुषार पडवळ यांनी केले.
Web Title: Rohit Pawar Elections Are Likely
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..