पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर यंदा संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेत पालखी सोहळ्यासाठी आवश्यक नियोजन निर्धारित वेळेत करण्यात यावे. तसेच, पालखी मार्गाच्या केलेल्या पाहणीत आढळलेल्या त्रुटींबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पालखी सोहळ्याबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे उपस्थित होते. तर, संबंधित तालुक्यातील उपविभागीय अधिकारी व तहसीलदार दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. डॉ. देशमुख म्हणाले, पालखी तळ आणि विसाव्याच्या ठिकाणी आरोग्य सुविधा, पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि स्वच्छतेबाबत आवश्यक नियोजन करण्यात यावे. स्वच्छतेची कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी.
पालखी महामार्गाची कामे सुरू असल्याने वाटेत अडथळा येणार नाही, यासाठी आवश्यक कामे तातडीने करून घ्यावीत. सासवड पालखी मुक्कामाच्या ठिकाणची जागा स्वच्छ करून घ्यावी. पुढील दहा दिवसांत संबंधित यंत्रणांची बैठक घेऊन कामांचे सूक्ष्म नियोजन करावे. गेल्या दोन वर्षांत कोविडमुळे पालखी सोहळा न झाल्याने यावर्षी अधिक संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन त्यादृष्टीने सुविधांचे नियेाजन करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.