पुणे विद्यापीठाच्या परीक्षांचा निर्णय झाला; जाणून घ्या परीक्षेचं स्वरूप!

savitribai phule pune university exam decision offline
savitribai phule pune university exam decision offline

पुणे Pune News : कोरोना मुळे कमी कालावधी परीक्षा पार पाडण्याचे आव्हान असताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा  विचार करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने यंदाच्या परीक्षा ऑफलाईनच (पारंपारिक पद्धतीने लेखी परीक्षा) घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गेले आठवडे परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन या चर्चेला पूर्ण विराम मिळाला आहे.

'कोरोना'मुळे सर्वच विद्यापीठ, महाविद्यालयांचे वेळापत्रक कोलमडून पडले. या परीक्षा कसे द्याव्यात यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) तसेच राज्य सरकारने कुलगुरूंची समिती नेमली होती. 'यूजीसी'ने परीक्षेबबात निर्देश देताना केवळ  शेवटच्या सत्राच्या किंवा वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जावी. ही परीक्षा ऑनलाईन किंवा ऑफलाईन घेता येईल, तसेच प्रश्नपत्रिकांचे स्वरूप बदलून कमी वेळात परीक्षा संपवावी असे त्यात नमूद केले होते. राज्य सरकारनेही याबाबत असेच निर्देश दिले होते. मात्र परीक्षा कमी वेळेत संपविण्यासाठी व सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यासाठी ऑनलाईन परीक्षांना प्राधान्य द्यावे असा मतप्रवाह होता. तर विद्यार्थी संघटनांनी ऑनलाईन परीक्षेस विरोध करत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा विचार करून पारंपारिक पद्धतीने लेखी परीक्षा द्यावी अशी मागणी केली होती. 

पुणे विद्यापीठात शेवटच्या सत्रातील/वर्षातील विद्यार्थ्यांची संख्या सुमारे २ लाल ४६ हजार आहे. याचे नियोजन करण्यासाठी विद्यापीठात बैठकांचे सत्र सुरू होते. पुण्यातील महाविद्यालयांमध्ये ऑनलाईन परीक्षेची सुविधा असली तरी पुणे जिल्हा, नगर, नाशिक येथील अनेक महाविद्यालयात पुरेसे संगणक, इंटरनेटची सुविधा नाही. तरीही ऑनलाईन परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ  शकते अशी चर्चा विद्यापीठातील बैठकांमध्ये समोर आली. त्यामुळे विद्यापीठाची परीक्षा लेखी घेण्यावर आज (शनिवारी) शिक्कामोर्तब  करण्यात आले. याबाबत परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अरविंद शाळीग्राम यांनी परिपत्रक काढले आहे.

डॉ. अरविंद्र शाळीग्राम म्हणाले, "विद्यापीठाच्या सर्व परीक्षा लेखी पद्धतीने होणार आहेत, कोणत्याही अभ्यासक्रमाची परीक्षा ऑनलाईन होणार नाही हा महत्वाचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. प्रश्नपत्रिकेचे स्वरुप कसे असेल, किती गुणाची परीक्षा असेल हे ठरविण्यासाठी विद्याशाखांच्या समिती नेमल्या आहेत. त्याच्या शिफारशी नुसार निर्णय होईल." विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर म्हणाले, "विद्यापीठाने आॅफलाईन पद्धतीने लेखी परीक्षा घेण्याचे स्पष्ट केले आहे. त्यानुसार आता प्रश्नपत्रिका अशी असेल, किती गुणांची असेल, त्याचे मूल्यांकन कसे करायचे  याचा विद्यापीठाने नेमलेल्या विद्याशाखांच्या समित्यांना ठरवता येणार आहे. याबाबत लवकरच कुलगुरूंना अहवाल सादर केला जाईल."

बॅकलॉग परीक्षेचाही निर्णय झाला

  • अंतिम सत्र/वर्षाच्या विद्यार्थ्यांची बॅकलॉगची परीक्षाही लेखी होणार
  • निकालासाठी ५० टक्के अंतर्गत गुण व ५० टक्के अंतीम सत्राची परीक्षा याचे मूल्यमापन होणार
  • तोंडी परीक्षा, प्रात्यक्षीक, प्रोजेक्ट यासाठी व्यवहार्यता तपासून व्हिडिओ कॉन्फकन्सींगद्वारे घेण्यात येईल
  • अंतिम वर्ष वगळता इतर सर्व विद्यार्थी पुढील वर्षासाठी पात्र, बॅकलॉगसाठी पुढील सत्रात परीक्षा देऊन उत्तीर्ण व्हावे लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com