
Baramati: `लोकसभेला जशी साथ दिली, तशीच आगामी विधानसभेला साथ द्या. पाच महिन्यानंतर आपले महाराष्ट्रात सरकार आल्यानंतर तुमचा नीरा नदी प्रदुषणाचा प्रश्न कसा निकाली निघत नाही ते मी बघतो. बारामतीमध्ये नदी प्रदुषणासारखे अनेक प्रश्न सोडवितो म्हणणारे मोठेमोठे पुढारी कोठे आहेत ?
शेवटी सत्ता आल्यानंतर समान्यांबरोबर शेतकऱ्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न सोडवावा लागतो, परंतु या तालुक्यात सांगवी, खांडज, नीरावागज आदी नीदा नदीकाठच्या गावात तसे झाले नाही,` अशा कडक शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या कार्य़कर्त्यांना नाव न घेता फटकारले.
लोकसभा निवडणूकीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांना बारामतीकरांनी भरभरून मतदान केले, त्या पार्श्वभूमिवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज (बुधवारी) नीरा नदी काठच्या गावांना भेटी दिल्या व तेथील गावकऱ्यांचे आभार मानले.
संवाद दौऱ्याच्यानिमित्ताने पवार यांनी सांगवी, खांडज, नीरावागज आदी नदी काठच्या गावांमध्ये घेतलेल्या सभांमध्ये नदी प्रदुषणाचा मुद्दा चांगलाच लावून धरला व अप्रत्यक्षपणे अजित पवार यांनाच धारेवर धरण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यावेळी योगेंद्र पवार, जगन्नाथ शेवाळे, सदाशिव सातव, सतिश खोमणे, एस.एन.जगताप, संदीप गुजर, अॅड. राजेंद्र काटे, श्रीहरी येळे, शरद तुपे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
नीरावागजमध्ये पवार म्हणाले, `जमीन आणि पाण्याची उपलब्धता आपल्या प्रपंचासाठी महत्वाची आहे. परंतु ही येथे जमिनही खराब झाली आणि पाणीही. या दोन्ही गोष्टी दुरुस्त करण्याची जबाबदारी केंद्र व राज्य सरकारची आहे. मध्यतरी केंद्रातील मंत्री आले पाहणी केली परंतु पुढे काहीही झाले नाही.
केंद्रात आता सुप्रिया सुळे यांना खासदार म्हणून तुम्ही पाठविले, आता विधानसभा निवडणूकीतही आपल्याला बदल घडवायचा आहे. पाच महिन्यानंतर आपले महाराष्ट्रात सरकार आल्यानंतर तुमचा नीरा नदी प्रदुषणाचा प्रश्न कसा निकाली निघत नाही ते मी बघतो.`
गावातील पुढाऱ्यांना तुम्ही मोठे केले, परंतु ते तुमचे प्रश्न विसले. त्यामुळेच तुम्ही त्यांची जागा लोकसभेला दाखवून दिली, असे सांगून पवार म्हणाले,`` मी सुरवातीच्या काळात नीरा नदीवर कोल्हापूरपद्धतीचे बंधारे बांधले आणि येथील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडविला. तसेच कृषी मंत्री असताना कर्जमाफी केली आणि तुमच्या कुटुंबाला आधार देण्याचे काम केले.
६७ सालापासून जुन्या जाणत्या लोकांनी मला साथ दिली म्हणून आपल्यामधील घरोबा अद्याप कायम आहे. तुम्ही आणि मी एकत्र येऊन सर्वकाही दुरुस्त करू. लोकशाही जिवंत ठेण्यासाठी समान्य मानूस पुढाऱ्याचे ऐकत नाही, हेच लोकसभेच्या निवडणूकीतून सिद्ध झाले.`` यावेळी ज्ञानदेव बुरुंगले, गणपत देवकाते, रोहन देवकाते, बाळासाहेब देवकाते, शरद तुपे, काका देवकाते, सुनिल देवकाते आदींनी मनोगते व्यक्त केली.
माळेगाव बुद्रूक येथे मंगळवार (ता. १८) रोजी सायंकाळच्यावेळी शरद पवार यांनी घेतलेला सभेला प्रतिसाद मिळाला. या सभेत पवार यांनी माळेगाव साखर कारखान्याच्या प्रगतीचा आढावा घेताना सांगितले, की साखर निर्मितीबरोबर इथेनाॅल, वीज निर्मितीचे प्रकल्प उभारण्यासाठी मी मोठी मदत केली. या कारखान्यामुळे शिवनगर शिक्षण संस्था मोठी झाली.
त्या संस्थेचा मी अध्यक्ष आहे. येथील शिक्षण संस्थेमुळे अनेक मुलमुली उच्चशिक्षित झाली आणि कामाधंद्यात यशस्वी झाल्याचे सांगितले. यापुढे गावपुढाऱ्याचा विकास न कराता जनतेचा विकास करायचा आहे, त्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊन पुन्हा विधानसभेत जिंकू आणि राज्यात सरकार आणून, असे आवाहन पवार यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.