Pune News : स्वयंसेवी संस्था हा महाराष्ट्राचा ठेवा : शरद पवार

‘सकाळ माध्यम समुहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार लिखित ‘अनुभवें आले’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बोलत होते.
Prataprao Pawar, Sharad Pawar and Ad. S. K. Jain
Prataprao Pawar, Sharad Pawar and Ad. S. K. Jainsakal

पुणे - ‘राज्यात आपत्ती आल्यावर समाजसेवी संस्था आणि सर्वसामान्य लोक भरभरून मदत करतात. ते सेवाकार्यात स्वतःला अगदी निःस्वार्थपणे वाहून घेतात. संकटाच्या काळात आपल्या कर्तव्याची जाण असलेला मोठा वर्ग राज्यात असून, खऱ्या अर्थाने हा महाराष्ट्राचा ठेवा आहे,’ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी येथे केले.

‘सकाळ माध्यम समुहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार लिखित ‘अनुभवें आले’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी ‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस यांनी शरद पवार, प्रतापराव पवार आणि शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष ॲड. एस. के.जैन यांच्याशी संवाद साधला.

सामाजिक कार्याची आत्मीयता, प्रेरणा आणि संस्था बांधणीचे सूत्र या त्रयींनी यावेळी उलगडले. देशाच्या कानाकोपऱ्यात एखाद्या विषयाला वाहून घेत आस्थेने कार्य करणारे तरुण आणि ज्येष्ठांची मोठी संख्या असल्याचे शरद पवार म्हणाले. आमच्या वैयक्तिक आणि सामाजिक कार्याचा पाया हा आईचे संस्कार असल्याचे प्रतापराव पवार यांनी सांगितले.

ते म्हणाले, ‘व्यावसायिक यशस्वीतेपेक्षा संस्थेचा मानवी चेहरा आवश्यक आहे. सामाजिक कार्यात निःस्वार्थपणे कामे करणारी लोक बघत गेलो. त्यामुळे नकळतच एक नैतिकतेची भिंत माझ्याभोवती उभी राहीली. लोकानूभवातून शिकत गेलो. सामाजिक जाणिवेतून कर्तव्यातील निरपेक्षपणा येत गेला. आत्मीयता, विश्वास आणि सांघिक भावनेने माझे सामाजिक कार्य विस्तारत गेले.’

संस्कृतबद्दल मला आस्था असून, तुम्ही अध्यात्म आणि व्यावसायात सांगड घालू शकता, असेही प्रतापराव पवार यांनी सांगितले. तर ‘अनुभवें आले’ या लेखमालेतून प्रेरणा मिळाल्याचे ॲड. जैन यांनी सांगितले. लेखांमधून वास्तविकतेच्या आधारावर लोकशिक्षण मिळाले. शैक्षणिक संस्था चालविताना काय गोष्टी करायला पाहिजे हे प्रतापरावांच्या लिखाणातून कळाल्याचेही ते म्हणाले.

पुस्तकाच्या निर्मिती मागची पार्श्वभूमी आणि प्रस्तावना सम्राट फडणीस यांनी केली. भूषण करंदीकर यांनी सूत्रसंचालन केले.

बारामतीत ‘एआय’चा प्रयोग

ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने बारामतीत ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टने कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा यशस्वी प्रयोग केल्याचे प्रतापराव पवार यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘ॲग्रिकल्चर ट्रस्टने आतापर्यंत १२ व्याख्याने दिली असून १५० देशांतील लोक ते ऐकतात.

बिल गेट्स फाउंडेशनचे कृषी क्षेत्रातील जगातील दुसरे सेंटर बारामतीमध्ये आहे. या प्रयोगामुळे एका एकरमधील शेतकऱ्याचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढेल, तर उत्पादनातील खर्च २० टक्क्यांनी कमी होईल. केवळ बारामती नाही तर संपूर्ण जगाला हे लागू होईल. हीच समाधानाची गोष्ट आहे.’

देणाऱ्याने देत जावे...

सामाजिक कार्यासाठी आपला मनोनिग्रह असेल तर वेळ निश्चित मिळतो, असा अनुभव प्रतापराव पवार यांनी सांगितला. नव्या पिढीला आवाहन करताना ते म्हणाले, ‘मनात आग आणि हृदयात प्रेरणा असलेली लोकांमध्ये प्रचंड क्षमता असते. स्वतःचे काम करत समाजासाठी योगदान देणे शक्य असते. त्याचा समाजाला नक्की उपयोग होईल.’

व्यवसायातले कमी समजते

व्यवहार आणि व्यवसायातील मला फार कमी समजत असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. तर प्रतापराव पवार हातात घेतील तो व्यवसाय यशस्वी करतात, असेही त्यांनी नमूद केले. महाविद्यालयीन काळात ‘नेता’ नावाचे साप्ताहिक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतीने काढलेल्या मासिकाचा अनुभव त्यांनी सांगितला. या दोन्ही अंकांचा दुसरा अंक निघाला नसल्याचेही त्यांनी मिस्कीलपणे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com