
Priti Maske : अवयवदान जागृतीसाठी सायकलीवर श्रीनगर ते कन्याकुमारी
पुणे - समाजामध्ये अवयवदानाबद्दल जागृती वाढावी म्हणून पुण्याच्या प्रीती म्हस्के यांनी श्रीनगर ते कन्याकुमारी हे तीन हजार ७२० किलोमीटरचे अंतर चक्क सायकलीवर पार केले आहे. ११ दिवस २२ तास आणि २३ मिनीटे सायकल चालवत त्यांनी अनोखा विक्रम प्रस्थापित केला आहे.
फेब्रुवारीच्या १२ तारखेला श्रीनगरच्या लाल चौकातील क्लॉक टॉवर येथून प्रारंभ झालेला सायकलचा प्रवास २४ फेब्रुवारीला संध्याकाळी सहा वाजून २५ मिनीटांनी कन्याकुमारी येथे संपला. यासंबंधीच्या नोंदी आणि पुरावे वर्ल्ड अल्ट्रा सायकलींगच्या माध्यमातून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांना सादर करण्यात आल्याचे, मोहीमेचे प्रमुख आनंद कन्सल यांनी सांगितले आहे.
मस्के म्हणाल्या, ‘गोठवणारे तापमान ते कडाक्याचे ऊन असा प्रवास करणे माझ्यासाठी आव्हानात्मक होते. दिवसातून फक्त तिन तासांपेक्षा कमी पॉवर नॅप घेत मी हे अतंर पार केले आहे. दिवसातून तीन वेळा एक तासाची डुलकी घेत हे अंतर मी पार केले.’ दोन मुलांची आई असलेल्या मस्के एक धावपटू आणि सायकलपटू आहे. २०२२ मध्ये त्यांनी दोन वर्ल्ड रेकॉर्ड केले आहे. मस्के यांनी पुनर्जन्म फाउंडेशनसाठी अवयवदानाचा प्रचार करत आहे. विशेषतः मेंदू मृत झालेल्या परिस्थितीत अवयवदानाचे महत्त्व, प्रभाव आणि प्रतिज्ञेसंदर्भात त्या जनजागृती करतात.