साखर कारखानदारीसाठी कडू बातमी 

sugarcane
sugarcane

भवानीनगर (पुणे) : एकीकडे नद्याकाठच्या भागातील महापुरामुळे उसाच्या उत्पादनात घट येणार, हे उघड दिसत असले; तरी प्रत्यक्षात राज्यभर जाणवलेल्या तीव्र दुष्काळामुळे उसाच्या उत्पादनात तब्बल 300 लाख टनांनी घट येण्याची चिन्हे आहेत. राज्यात सुरवातीच्या अंदाजानुसार 843 लाख टन उसाची उपलब्धता 570 लाख टनांवरून आता 500 लाख टनांवर येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

राज्यात मागील वर्षी उसाचे बंपर पीक आले. राज्यातच नव्हे; तर देशातही उसाचे विक्रमी उत्पादन झाले. त्यातून मागील हंगामात देशात 326 लाख टन साखरेचे उत्पादन झाले. राज्यात तब्बल 951 लाख टन उसाचे गाळप झाले. त्यातून 107 लाख टन साखरेचे उत्पादन झाले. याहीवर्षी खरेतर तीच स्थिती होती. मात्र, दुष्काळाने साऱ्या उत्पादनाच्या विक्रमावर पाणी फिरवले. राज्यभर पडलेल्या तीव्र दुष्काळाचा सर्वाधिक फटका उसाच्या पिकाला बसला. त्यानंतर उच्च साखर उताऱ्याचा पट्टा मानल्या जाणाऱ्या कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांना महापुराचा फटका बसला. या सर्वांचा एकत्रित परिणाम येणाऱ्या हंगामात होणार आहे. येणाऱ्या हंगामात कमी उसाच्या उपलब्धतेमुळे साखर कारखान्यांचा उत्पादन खर्च वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

किमान 50 कारखाने बंद राहणार? 
उसाच्या येणाऱ्या हंगामात राज्यातील यापूर्वी हंगाम घेतलेल्या 195 साखर कारखान्यांपैकी किमान 50 कारखाने बंद राहतील, अशी सध्या स्थिती आहे. उरलेल्या कारखान्यांनाही त्यांच्या क्षमतेएवढा ऊस मिळणार नाही, अशी चिन्हे आहेत. दुसऱ्या टप्प्यातील अंदाजानुसार साखर उद्योगात आता 500 लाख टनापर्यंत ऊस उपलब्ध होईल, असे बोलले जात आहे. एकंदरीत 300 ते 350 लाख टन उसाची उपलब्धता कमी होणार आहे. त्यामुळे यावर्षी साखरेचे उत्पादनही 50 ते 60 लाख टनांपर्यंत मर्यादित राहण्याची शक्‍यता साखर उद्योगातील तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

कमी उत्पादनाचा फटकाही आणि संधीही 
याबाबत छत्रपती कारखान्याचे कार्यकारी संचालक गोविंद अनारसे म्हणाले, ""या वर्षी प्रत्येक कारखान्याच्या कार्यक्षेत्रात उसाची उपलब्धता कमी राहील. छत्रपती कारखान्याच्या कार्यक्षेत्रात अवघा 3.84 लाख टन ऊस उपलब्ध राहील, अशी चिन्हे आहेत. मागील हंगामात कारखान्याच्या कार्यक्षेत्रातून 6.80 लाख टन ऊस उपलब्ध झाला होता. असेच कमी अधिक चित्र राज्यभर असून, कमी उत्पादनामुळे साखरेच्या उत्पादनात भरीव वाढ होऊन त्याचा फटका कारखान्यांना बसेल. मात्र, दुसरीकडे आज जी साखरेच्या उठावाबाबत उदासीन चित्र दिसते, ते चित्र बदलून साखरेच्या दराला व साखरेच्या विक्रीलाही उठाव मिळेल, अशी आशा आहे.  

 - दुष्काळ, महापुरामुळे ऊस उत्पादन 300 लाख टनांनी घटण्याची शक्‍यता.                    - राज्यात सुरवातीच्या अंदाजानुसार 843 लाख टन उसाची उपलब्धता 570 लाख टनांवरून आता 500 लाख टनांवर येण्याची भीती.                        - साखरेचे उत्पादनही 50 ते 60 लाख टनांपर्यंत मर्यादित राहण्याची शक्‍यता 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com