पुणे - आम आदमी पार्टीने आता महाराष्ट्रात लक्ष केंद्रित केले असून पक्षाची भूमिका गावोगावी घेऊन जाण्यासाठी ‘स्वराज्य यात्रा’ आयोजित केली आहे. या यात्रेची सुरवात येत्या रविवारी (ता. २८) पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात दर्शन घेऊन होणार आहे. तर रायगड येथे राज्याभिषेक दिनी (ता. ६) स्वराज्य यात्रेची सांगता होणार आहे.
ही यात्रा सात जिल्ह्यात जाणार असून या जिल्ह्यातील शहरे आणि गावांमध्ये सभा होणार आहेत. तब्बल ७८२ किलोमीटरचा प्रवास यात्रेच्या निमित्ताने करण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत ‘आप’चे मुकुंद किर्दत यांनी दिली. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय सह-सचिव व युवा नेते गोपाल इटालिया, धनंजय शिंदे, विजय फाटके आदी उपस्थित होते.
इटालिया म्हणाले, ‘देशातला सर्वात मोठा पक्ष म्हणवून घेणारा भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात मात्र हरण्याच्या भीतीने एकही निवडणूक होऊ देत नाही. त्यामुळेच प्रशासन मनमानी कारभार करते आहे. भ्रष्टाचारावर कुणाचेच नियंत्रण राहिलेले नाही. या दडपशाही विरोधात आवाज उठवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनातील स्वराज्य आणण्यासाठी आम आदमी पार्टी प्रयत्नशील आहे.’
या यात्रेच्या निमित्ताने विविध गावांमध्ये, शहरांमध्ये कार्यक्रम आयोजित केले जाणार असून संघटन अधिकाधिक मजबूत करण्याचा प्रयत्न पक्षातर्फे होणार आहे. ‘आप’तर्फे अधिकाधिक नागरिकांना या यात्रेत सहभागी करून घेण्यात येणार आहे. एकीकडे वाढती महागाई असताना शेतकरी, नोकरदार, पालक यांचे प्रश्नांबाबत सरकार सोडाच परंतु प्रस्थापित विरोधी पक्ष सुद्धा आवाज उठवण्यास तयार नाही. अशा वेळेस सामान्य जनतेचा आवाज बनून आम आदमी पार्टी रस्त्यावर उतरू पाहत आहे,’ असे किर्दत यांनी सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.