‘पुणेकरांनो, तुम्हाला पुढील दोन-चार दिवसांत सुटाबुटातले काही लोक भेटतील

Swatch-Bharat abhiyan
Swatch-Bharat abhiyan

पुणे - ‘पुणेकरांनो, तुम्हाला पुढील दोन-चार दिवसांत सुटाबुटातले काही लोक भेटतील. ते प्रश्‍न विचारतील. त्याची उत्तरे न टाळता नक्की द्या. तेव्हा नेमकी वस्तुस्थिती सांगा. तुमच्या उत्तरांत पुण्याच्या स्वच्छतेची गुणवत्ता ठरणार आहे; त्यावरून केंद्र सरकारच्या स्वच्छ अभियानाचा निकाल जाहीर होणार आहे. त्याकरिता महापालिकेला कल्पना न देताच सरकारने नेमलेल्या ‘एजन्सी’चे अधिकारी पुणेकरांच्या भेटीला येणार आहेत. परिणामी, महापालिकेच्या परीक्षेचा निकाल पुणेकरांच्या हाती राहणार आहे.

स्वच्छ भारत अभियानाची अंतिम फेरी सुरू असून, ती जिंकण्यासाठी अवघ्या २८४ चौरस किलोमीटरचे पुणे शहर चोवीस तास चकाचक ठेवण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. त्यासाठी रस्त्यावरची अतिक्रमणे, बेकायदा जाहिरात फलके उतरवितानाच रस्त्यांवर कचरा करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा सपाटा महापालिकेने लावला आहे. सार्वजनिक ठिकाणांची साफसफाई करतानाच वैयक्तिक स्वच्छतेवर महापालिकेने भर दिला आहे. अभियानाच्या मोहिमेत सामान्य नागरिकांचा सहभागही वाढविला आहे.

या पार्श्‍वभूमीवर रस्ते, स्वच्छतागृहे, सरकारी-निमसरकारी कार्यालयांसोबत विमानतळ, रेल्वे आणि ‘एसटी’ स्थानकांची पाहणी होणार आहे. त्याशिवाय, थेट लोकांत जाऊनही स्वच्छतेच्या कामांचा आढावा घेण्यात येणार आहे. त्यासाठी विविध घटकांत सामावलेल्या पुणेकरांना स्वच्छतेसंदर्भातील १९ प्रश्‍न विचारले जाणार आहेत. त्याची उत्तरे जाणून लगेचच नियंत्रण कक्षाला अहवाल पाठविला जाणार आहे. पाहणी आणि अहवालासाठी केंद्राने तीन ‘एजन्सी’ नेमल्या असून, त्यातील अधिकाऱ्यांशी पुणेकरांनी मोकळेपणाने संवाद साधावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com