'सकाळ'च्या बातमीने वाचविले पुणेकरांचे 23 कोटी!

'सकाळ'च्या बातमीने वाचविले पुणेकरांचे 23 कोटी!

पुणे - तलावांत जलपर्णी उगवली नसतानाही तिच्या नावाखाली पुणेकरांचे तब्बल २३ कोटी हडप करण्याचा महापालिकेतील पदाधिकारी, अधिकारी आणि ठेकेदारांचा डाव ‘सकाळ’मधील वृत्तामुळे उधळला गेला आहे. हे वृत्त प्रसिद्ध होऊन चोवीस तास होण्याआधीच या कामाच्या निविदा जादा दरानेच आल्याची कुबली देत, पाषाण आणि कात्रजमधील तिन्ही तलावांच्या कामांच्या निविदा रद्द केल्या आहेत. तसेच जेव्हा गरज असेल तेव्हाच तात्पुरती यंत्रणा मागवून तासानुसार काम केले जाईल, असे प्रशासनाने कबूल केले. तलाव चकाचक असूनही एवढा खर्च करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महापालिकेच्या कारभाराचे ‘सोशल मीडिया’वरील चर्चेत वाभाडे काढले.  

कात्रजमधील नानासाहेब पेशवे आणि राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील तलावासह पाषाणमधील तलावांतील जलपर्णी काढण्यासाठी महापालिकेच्या वाहन विभागाने 23 कोटी रुपयांच्या निविदा मागविल्या. त्यात 23 कोटी 50 लाख रुपयांच्या निविदा कमी दराच्या होत्या. त्या मंजूर करीत तसा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवण्याच्या हालचाली वाहन खात्याने केल्या होत्या. त्याआधीच तलावांत इतकी जलपर्णी कशी काय उगवली, याचा शोध घेतला असता एकाही तलावात औषधापुरतीही जलपर्णी नसल्याचे "सकाळ'च्या पाहणीत उघड झाले. तरीही महापालिका इतका खर्च का करते आहे? याबाबतचे वृत्त "सकाळ'ने शनिवारी (ता. 9) ठळकपणे प्रसिद्ध केले. त्याची दखल घेत या महागड्या निविदा रद्द करून नव्याने निविदा मागविण्याचा निर्णय महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी आज घेतला.

""तलावांतील जलपर्णी कायमस्वरूपी संपविण्यासाठीच यंत्राद्वारे ती काढण्याचा निर्णय झाला होता. मात्र, त्यासाठी आलेले दर खूपच जास्त असल्याचे आढळून आले आहे, त्यामुळे या कामाची प्रक्रिया पुन्हा केली जाईल,'' असेही निंबाळकर यांनी सांगितले. 

ते म्हणाले, ""आतापर्यंत तलावांतील जलपर्णीसाठी दरवर्षी एक कोटी रुपये खर्च केला जात होता. परंतु, त्याचा परिणाम होत नसल्यानेच यंदा जादा दर देऊन चांगल्या दर्जाचे काम करण्याचे नियोजन होते. त्यात ठेकेदारांकडून हमी घेतली जाणार होती. तलावांत जलपर्णी असल्यानेच या निविदा मागविल्या होत्या; परंतु त्यांचे दर पाहता त्या रद्द केल्या आहेत.'' 

नगरसेवकांच्या निधीतून तलावांची स्वच्छता 
पाषाण आणि कात्रजमधील तलावांमधील जलपर्णी स्थानिक नगरसेवकांनी आपल्या निधीतून काढल्याचेही उघड झाले आहे. ही कामे केल्याचे फलक या मंडळींनी तलावाभोवती लावले आहेत. पेशवे तलावातील जलपर्णी काढण्यासाठी केवळ सात लाख रुपये खर्च आला असून, तो स्वतः केल्याचे नगरसेवक प्रकाश कदम यांनी सांगितले. राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील तलावातील जलपर्णी काढल्याचे वसंत मोरे यांनी सांगितले. नगरसेवकांच्या निधीतूनच ही कामे होत असतील तर प्रशासनाकडून भल्यामोठ्या रकमेच्या निविदा का काढल्या जात आहेत, असा प्रश्‍न आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com