बालशिक्षणात शांतता व सहिष्णुता ही मूल्ये गरजेची

गिजूभाई व ताराबाई या दोघांनी मॉंटेसरी पद्धतीच्या शिक्षणाला भारतीय रूप दिलं. हीच भारतातील बालशिक्षणाची नांदी ठरली.’’
मुंबई
मुंबईsakal

बालशिक्षणातील शास्त्रशुद्ध शिक्षणपद्धतीच्या जनक मारिया माँटेसरी यांचा जन्मदिन आणि त्यांच्या प्रारूपाचं भारतीयकरण करून थेट आदिवासी पाड्यांपर्यंत शिक्षणाचा प्रवाह नेणाऱ्या ताराबाई मोडक यांचा स्मृतिदिन नुकताच झाला. ‘‘या दोघींनी बालशिक्षणात निसर्ग व समाज हे महत्त्वाचे घटक मानले. शांतता, सहिष्णुता, स्वावलंबन आदी मूल्यांवर भर दिला. हे सारं आजही गरजेचं आहे,’’ असं मनोगत कोल्हापूरमधील ‘सृजन आनंद शिक्षण केंद्रा’त पस्तीस वर्षे कार्यरत असलेल्या सुचिता पडळकर यांनी व्यक्त केलं आहे.

पडळकर म्हणाल्या, ‘‘माँटेसरी यांचा जन्म अठराशे सत्तर सालचा. इटलीतील ही वैद्यकीय शिक्षण घेतलेली महिला शिक्षणातून बालकांचं कल्याण घडावं या अतीव ओढीने झपाटली गेली. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धाच्या झळांनी जग पोळून निघालं होतं. माँटेसरी यांनाही त्यामुळे शांततेचं मोल पटलं होतं व हे मूल्य बालपणातच रुजायला हवं, असं त्यांना वाटत होतं. ताराबाईंवर मॉंटेसरी यांच्या शिक्षणपद्धतीची छाप पडली, ती सौराष्ट्रातील गिजूभाई बधेका यांच्या संपर्कात आल्यामुळे. ते माँटेसरी पद्धतीने बालकांना शिक्षण देत होते. गिजूभाई व ताराबाई या दोघांनी मॉंटेसरी पद्धतीच्या शिक्षणाला भारतीय रूप दिलं. हीच भारतातील बालशिक्षणाची नांदी ठरली.’’

त्या म्हणाल्या, ‘‘ताराबाईंनी विचार केला की, महात्मा गांधी सांगतात, त्याप्रमाणे शिक्षण हे प्रत्येक मुलांपर्यंत पोहोचलं पाहिजे. मात्र, मॉंटेसरी पद्धतीची शैक्षणिक साधनं सर्वांना मिळतील, परवडतील असं नाहीत. ठाणे जिल्ह्यातील कातकरी, वारली आदिवासींच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ताराबाईंनी घरात व अंगणात सहज उपलब्ध साधनांचा उपयोग केला. मुलं स्वयंपाकघरातील छोट्या छोट्या कामांमध्ये सहभागी होत आरोग्य, पोषण, स्वच्छता, नीटनेटकेपणा, ताळमेळ आदी मजेत शिकू लागली. अंगण, शेत व परिसरातील नदी अथवा तलाव हे त्यांचे वर्ग झाले. पानाफुलांचं स्वरूप, कीटक, पक्षी, दगड आदींच्या निरीक्षणातून रोज काही तरी रंजक माहिती मिळू लागली. या अनौपचारिक वाटणाऱ्या शिक्षणातून मुलांना विविध विद्याशाखांच्या अभ्यासात रस वाटू लागला. असे विलक्षण प्रयोग करणाऱ्या ताराबाईंचा मृत्यू एकोणीसशे त्र्याहात्तरमध्ये झाला.’’

पडळकर यांनी असंही सांगितलं की, मॉंटेसरी व ताराबाई या दोघींचं जीवितकार्य शांतता व शिक्षण स्तंभांवर आधारलेलं होतं. कोल्हापुरात प्राचार्य लीला पाटील यांच्या ‘सृजन आनंद शिक्षण केंद्रा’त मला त्यांची सहकारी शिक्षिका म्हणून काम करताना अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. लीलाताईंनी विकसित केलेल्या पद्धतीत माँटेसरी, ताराबाई, गांधीजी व रवींद्रनाथ टागोर यांच्यासारख्यांच्या समान सूत्रांचा मिलाफ जाणवतो. भारतात वीसशे पाचमध्ये आखला गेलेला शिक्षण आराखडा, हा वीसशे दहामध्ये अस्तित्वात आला. यातही शिक्षणात शांतता व सहिष्णुता या मूल्यांचा स्पष्ट उल्लेख आहे. जागतिक व गावोगावच्या स्थानिक पटलावर आज दिसणारी हिंसक कृत्यं मनाचा थरकाप उडवतात. अहिंसक वातावरण, सलोखा यासाठी पायाभूत असलेल्या शांतता या भावनेचं शिक्षण बालपणापासूनच सहजपणे दिलं गेलं पाहिजे, याचं महत्त्व आज खूपच लक्षात येतं आहे. घरातील विविध कामांमधून कितीतरी प्रकारची शारीरिक-मानसिक कौशल्यं व क्षमता विकसित होतात. घर व शाळा नीटनेटकी ठेवण्यासाठीच्या कामांमधून सौंदर्यदृष्टी वाढीस लागते. जीवन जगता जगता शिकण्यातील आनंद अलौकिक असतो. यातून सतर्कता, एकाग्रता, सर्जनशीलत आदींचा आनंदानुभव आल्यामुळे मूल त्याकडे पुन्हा वळू पाहतं. निसर्ग व समाज हे दोन महत्त्वाचे शैक्षणिक घटक मानून लीलाताईंनी केलेले बालककेंद्री प्रयोग, त्यांच्या पश्चात आम्ही अमलात आणत आहोत.

पगार न घेता स्वयंसेवी पद्धतीने अध्यापन व प्रशासनिक कार्य करताना माझ्यासारखे आणखी काही सहकारी आनंदच मानतात. या शिक्षणपद्धतीतील अर्थपूर्णतेला वंदन म्हणून व लोकशाही शिक्षणपद्धतीत समाजघटक या नात्याने आम्ही स्वेच्छेने आपापला खारीचा वाटा उचलतो.

- सुचिता पडळकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com