कृषी उपसा जलसिंचन योजनेच्या ५५ विज पंपाच्या केबलची चोरी

शेतकऱ्यांना दहा दहा लाख रुपयांचा भुर्दंड : वर्षभरातील पाचवी घटना
Theft of 55 electric pump cables of Krishi Upsa Water Irrigation Scheme
Theft of 55 electric pump cables of Krishi Upsa Water Irrigation Scheme

नारायणगाव - येडगाव धरण जलाशयात असलेल्या इंदिरानगर येथील ५५ कृषी विज पंपाच्या सुमारे दहा लाख रुपये किंमतीच्या केबल अज्ञात चोरट्यांनी आज पहाटेच्या सुमारास चोरून नेल्या. केबल चोरीची मागील वर्षभरातील ही पाचवी घटना आहे. सततच्या केबल चोरीमुळे या भागातील प्रत्येक शेतकऱ्याला मागील वर्षभरात एक लाख रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. केबल चोरीच्या दुष्ट चक्रातून आमची कधी सुटका होणार अशी हतबलता शेतकरी वैभव भिसे, जयसिंग भिसे, प्रकाश नेहेरकर, शिवाजी नेहेरकर, सचिन नेहेरकर यांनी व्यक्त केली आहे.

येडगाव ग्रामपंचायत हद्दीतील इंदिरानगर, कैलासनगर, हांडे मळा, गणेशनगर, दोन देवळे परिसरात शेतकऱ्यांच्या सुमारे चारशे कृषी उपसा जलसिंचन व नळ पाणीपुरवठा योजनेच्या वीज मोटारी येडगाव धरण जलाशयात आहेत. प्रत्येक मोटारीला सुमारे शंभर मीटर लांबीची तांबे धातु असलेली केबल जोडलेली आहे. १५ एप्रिल २०२२ रोजी येथील दोन देवळे परिसरातील बत्तीस मोटारीच्या २६ एप्रिल २०२२ रोजी गणेश नगर - हांडे मळा येथील बावीस कृषी विज पंपाच्या केबलची चोरी झाली. त्यानंतर आज पहाटेच्या सुमारास इंदिरानगर येथील ५५ कृषी विज पंपाच्या केबल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या.

केबल चोरी झाल्यानंतर पुन्हा नवीन केबल टाकून कृषी पंप सुरू करावा लागतो. एका कृषी पंपाच्या केबलसाठी पंधरा ते वीस हजार रुपये खर्च होतो. मागील वर्षभरात काही शेतकऱ्यांच्या चार ते पाच वेळा केबलची चोरी झाल्याने या भागातील प्रत्यके शेतकऱ्याला किमान एक लाख रुपयांचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला आहे. यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. या बाबतच्या तक्रारी वारंवार नारायणगाव पोलिस ठाण्यात दिल्या जातात. मात्र केबल चोरांचा कायमस्वरूपी छडा लावण्यात पोलिसांना यश येत नाही.

पोलिस सायरन वाजवत या भागात रात्रीची एक फेरी मारतात.पोलिस येऊन गेल्या नंतर किंवा येण्याच्या अगोदर चोरटे केबल चोरी करून पसार होतात. अशी माहिती शेतकरी वैभव भिसे यांनी दिली.केबल चोरी केल्या नंतर चोरटे केबल जाळून त्या मधील तांबे धातूच्या तारेची विक्री करतात. ही तार भंगार व्यावसायिक खरेदी करतात.

आंदोलनाचा इशारा

सततच्या केबल चोरीमुळे शेती व्यवसाय अडचणीत सापडला आहे. केबल चोरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात पोलिसांना अपयश आले आहे. पुन्हा केबलची चोरी झाल्यास नारायणगाव पोलीस स्टेशन समोर आंदोलन करण्याचा इशारा माजी सरपंच गुलाबराव नेहेरकर, वैभव भिसे यांनी शेतकऱ्यांच्या वतीने दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com