पुणे : यंदा हापूसची चव चाखण्यासाठी प्रतिक्षा करावी लागणार

झाडांवर 25 ते 30 टक्केच फळधारणा; तुटवडा जाणवणार
Alphonso Mango
Alphonso Mango e sakal

पुणे : सततच्या बदलणार्‍या निसर्ग चक्रामुळे यंदा कोकणातील हापूस आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. हापूस आंब्याचा हंगाम उशिरा सुरू होत आहे. सद्य:स्थितीत घाऊक आणि किरकोळ बाजारात मोजकीच आवक होत आहे. अजूनही आंब्याचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्यात आलेले नाहीत. भाव आवाक्यात येण्यासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

बाजारात साधारणतः 15 एप्रिलनंतर हापूसची आवक वाढणार असल्याचा अंदाज आहे. बाजारातील आवक वाढल्यानंतरच काही प्रमाणात भाव कमी होतील. तोपर्यंत मात्र हापूसचे भाव जास्तच असणार आहेत. प्रारंभीच्या काळात मोहर मोठ्या प्रमाणात गळाला. तसेच त्यानंतर मोहराला आलेले फळही मोठ्या प्रमाणात गळाले आहेत. त्यामुळे यावेळी फळ धारणा कमी असल्याने बाजारातील आवक लांबणीवर पडली असल्याचे मार्केटयार्डातील व्यापारी अरविंद मोरे यांनी सांगितले.

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा झाडावर केवळ 25 ते 30 टक्केच फळे टिकली आहेत. त्यामुळे बाजारातही आवकही कमीच होत आहे. झाडांना लागलेला मोहर गळू नये, यासाठी शेतकर्‍यांनी विशेष काळजी घेतली. त्यासाठी अधिकचा खर्चही केला आहे. मात्र ज्या शेतकर्‍यांनी काळजी घेतली नाही. त्यांच्या अमराईतील झाडांचा मोहर मोठ्या प्रमाणात गळून पडला आहे. वादळ, वारा, पावसामुळे फळे गळाली आहेत. तसेच कोकणातील आंब्याच्या झाडावर रोगाचा प्रभाव अधिक आहे. त्याचा फटकाही शेतकर्‍यांना सहन करावा लागत असल्याचे तेथील शेतकरी सांगत आहेत.

यामुळे हंगामास उशीर

  • - सततच्या बदलणार्‍या निसर्ग चक्रामुळे

  • - वादळ, वारा, पावसामुळे फळे गळाली

  • - यंदा झाडावर केवळ 25 ते 30 टक्केच फळे

  • - आंब्याच्या झाडावर रोगाचा प्रभाव

कोकणातून रोज फळ बाजारात 1500 ते 2000 पेट्यांची आवक होत आहे. कच्या आंब्याच्या 3 ते 6 डझनाच्या पेटीला 5 ते 6 हजार रूपये दर मिळत आहे. तसेच तयार मालाच्या 3 ते 6 डझनाच्या पेटीला 3.5 ते 7 हजार रूपये दर मिळत आहे. यावेळी हापूससाठी चांगले वातावरण आहे.

- युवराज काची, व्यापारी, मार्केट यार्ड.

चार ते पाच वेळा झांडाना मोहर

यंदा कोकणातील काही भागातील आंब्यांच्या झाडांना चार वेळा, तर काहीभागातील झाडांना पाच वेळा मोहर आला. झाडे मोहरलानी लखडली होती. मात्र प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या कारणास्तव मोहर गळून पडला. ज्या भागात मोहर टिकला. त्या झाडावर काही प्रमाणात फळे टिकून आहेत. मात्र अशा झाडांवरील फळांचे प्रमाण खुपच कमी आहे. त्यामुळे यंदा कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत आहे.

उत्पन्नापेक्षा औषध, मजुरीवर अधिक खर्च

फळधारणा कमी असेल, तर शेतकरी अडचणीत येत आहे. सद्य:स्थितीत तरी उत्पन्नापेक्षा मजुरी आणि औषधांचा खर्च अधिक होत आहे. अधिकच्या औषध वापरामुळे झाडांचे नुकसान होत आहे. मागील काही वर्षांपासून कोकणात मजुरांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यातच झाडावर आणि फळावर पडणार्‍या वेगवेगळ्या रोगाचे प्रमाण वाढल्याने 10 ते 12 वेळा फवारणी करावी लागत आहे. औषधांच्या किंमतीत अव्वाच्या सव्वा वाढ झाली आहे.

- गणेश झगडे, मकरंद काने - शेतकरी, रत्नागिरी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com