पुणे : जगण्याचा संघर्ष हा मानवी जीवनाप्रमाणे प्राण्यांना देखील करावा लागतो. अस्तित्व टिकविण्याचा असाच काही संघर्ष वाघ या वण्याप्रण्याला ही करावा लागला. ताडोबा असो किंवा रणथंबोर, वाघांच्या अधिवासात त्यांच्या जगण्याचा एक थरारक प्रवास शुक्रवारी (ता. ६) पुणेकरांनी अनुभवला.
निमित्त होते ते 'व्याघ्रस्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सवाचे'. वाघांच्या संवर्धनासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रोजेक्ट टायगर' या कार्यक्रमाला यंदा ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध वन्यजीव चित्रपटकार नल्ला मुत्थू यांनी आतापर्यंत केलेल्या विविध जंगलातील काही निवडक चित्रफितींच्या माध्यमातून वाघांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी नल्ला मुत्थू यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त राहुल रंजन महिवाल, माजी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, औरंगाबाद मुख्य वनसंरक्षक सत्यजीत गुजर,
पुणे जिल्ह्याचे मुख्य वनसंरक्षक एन.आर.प्रवीण, पुणे जिल्ह्याचे उपवनसंरक्षक (वन्यजीव) तुषार चव्हाण, उपवनसंरक्षक (प्रादेशिक) राहुल पाटील, रोहन बिल्डर्सचे संजय लुंकड, सुमन शिल्पचे महेश नामपूरकर, नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्टचे अनुज खरे आदी उपस्थित होते.
यावेळी महिवाल म्हणाले, "पीएमआरडीएच्या माध्यमातून होत असलेल्या विकासात वन आणि निसर्ग यांचे महत्त्व लक्षात घेऊन विकासाचा आराखडा निश्चित करण्यात आला आहे. नेचर वॉक सारख्या संस्थांनी अशा प्रकारचे अधिकाधिक कार्यक्रम घेण्याची गरज आहे."
नल्ला मुत्थुंच्या कामामुळे जनमानसात निसर्ग एका वेगळ्या दृष्टिकोनातून पोहोचत असल्याचे नामपूरकर यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रायोजक रोहन बिल्डर्स व डेव्हलपर्स हे तर, हेरिटेज डिझाईन्सचे विशेष साहाय्य लाभले. ‘सकाळ’ हे कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिरुद्ध दडके यांनी केले.
डोळ्यांचे पारणे फेडणारा अनुभव :
यावेळी नल्ला मुत्थू यांनी, व्याघ्र संवर्धनासाठी केले जाणारे प्रयत्न, सध्याची वाघांची परिस्थिती यावरही त्यांनी भाष्य केले. त्यांनी सादर केलेल्या अप्रतिम चित्रफितीनी उपस्थित लोकांना डोळ्याचे पारणे फेडणारा अनुभव आला.
वाघीण आपल्या पिल्याना हद्द प्रस्थापित करण्यापासून ते शिकार करण्याचे देत आलेले धडे, वाघिणी ऐवजी वाघ आपल्या पिल्ल्यांची घेत असलेली काळजी, आपल्या पिल्ल्याना घेऊन सरोवर पार करताना एकाचा होणारा मृत्यू, अन् मग हीच पिल्ले मोठी होऊन आपल्या स्वतंत्र प्रवासाला करत असलेली सुरवात.
विविध व्याघ्र प्रकल्पात असलेल्या वाघांच्या जीवन प्रवासाचे अनेक पैलू या दृश्राव्य व्याख्यानाच्या माध्यमातून उलगडले.
"वनसंवर्धन विषयात वनविभाग आणि त्यांच्यासोबत सामान्य नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचे आहे. यमुळे संवर्धनाच्या आणि एक संतुलित परिसंस्था राखण्यास मदत होते.
आज वनविभागाच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रासह देशात वाघांची संख्या वाढली आहे. तसेच देशातील विविध व्याघ्र प्रकल्पात वाघांचा मुक्त वावर शक्य झालं आहे. नक्कीच हे लोकसहभागातून शक्य झाले."
- सुनील लिमये, माजी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.