पुणे : ‘‘भारत - पाकिस्तान मधील १९७१ चे युद्ध आणि त्यातून बांगलादेशच्या निर्मितीला आज ५० वर्षे पूर्ण झाले आहेत. गेल्या पाच दशकांपासून बांग्लादेशा सोबत भारताने सामाजिक, सांस्कृतिक संबंध कायम ठेवले आहे. या युद्धात दक्षिण मुख्यालयाने पश्चिमी सीमावर्ती भागात महत्त्वाची भूमिका बजावली. या युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी विर पत्नी व त्या युद्धातील निवृत्त लष्करी अधिकारी येथे उपस्थित आहेत. हा क्षण अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे.’’ अशी भावना व्यक्त केली दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे एस नैन यांनी.
यंदाचे वर्ष हे देशात ‘स्वर्णिम विजय वर्ष’ म्हणून साजरा करण्यात येत असून गेल्या वर्षी नवी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारक येथून चार मुख्य दिशांनी चार मशालींच्या प्रस्थानाने या विजयोत्सवाची सुरवात झाली होती. याचाच एक भाग म्हणून पश्चिम दिशेने निघालेली विजय मशाल आज पुण्यात पोचली. दक्षिण मुख्यालयाच्या राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे लेफ्टनंट जनरल नैन यांनी या विजय मशालीचे स्वागत करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला बांगलादेशचे उप उच्चायुक्त लुत्फोर रहमान व इतर अधिकारी उपस्थित होते.
विजय मशालीचे स्वागत-सन्मानासाठी दक्षिण कमांड युद्ध स्मारकात एक भव्य समारंभ आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी लेफ्टनंट जनरल नैन यांनी निवृत्त अधिकारी आणि वीर पत्नींचा सत्कार केला आणि त्यांच्याबद्दल दृढ ऐक्य आणि कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी १९७१ च्या युद्धादरम्यान जवानांच्या अतुलनीय पराक्रमामुळे मिळालेला निर्णायक विजय आणि ९३ हजार पाकिस्तानी सैनिकांचे आत्मसमर्पण ज्यामुळे युद्धाच्या इतिहासात देदीप्यमान कामगिरीची झालेली नोंद आणि त्याचबरोबर बांगलादेशच्या ‘मुक्ती जोधांच्या’ अमूल्य योगदानाबाबत नैन यांनी भर दिला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.