तंटामुक्त समित्या नावापुरत्याच मर्यादित
रांजणगाव गणपती, ता. १५ ः शिरूर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील गावांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या तंटामुक्त गाव समित्या सध्या केवळ नावापुरत्या मर्यादित असल्याचे निदर्शनास येऊ लागल्या आहे. पूर्वी गावातील तंटे गावातच मिटविल्यानंतर गावची लोकसंख्या व गुणांच्या आधारे रोख रकमेच्या स्वरूपात गावांना बक्षीस दिले जात होते. मात्र, आता बक्षीस मिळत नसल्याने समिती पदाधिकाऱ्यांनी समितीच्या कामाकडे दुर्लक्ष केले आहे. शासनाने पुन्हा एकदा तंटामुक्त गाव बक्षीस योजना सुरू करून रोख रकमेतून गावाचा विकास साधावा, अशी मागणी होऊ लागली आहे.
शिरूर तालुक्यात शिरूर, रांजणगाव गणपती, शिक्रापूर या पोलिस स्टेशन अंतर्गत शांतता सुव्यवस्था राखली जाते. मागील काळात तालुक्यातील प्रत्येक गावात तंटामुक्त गाव समिती स्थापन करण्यात आली होती. त्यातून मोठ्या प्रमाणात तंटे मिटवले गेले. गाव तंटामुक्त होऊन त्यांनी लोकसंख्या व गुणांच्या आधारावर लाखोंची बक्षीसे मिळवली. अनेक गांवानी तंटामुक्त गाव पुरस्कार प्राप्त केला. त्यामुळे गावाच्या वेशीवर तंटामुक्त गाव असे फलक झळकत आहेत.
न्याय व्यवस्थेवरील ताण कमी व्हावा. दिवाणी, प्रलंबित तंटे, बांधावरील तंटे व वाद, गावातील किरकोळ वाद गावातच बसवून मिटवले जावे, या उद्देशाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम ही योजना राबविण्यात आली. दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या संकल्पनेतील या योजनेला लोकांनी देखील डोक्यावर घेतले. गावोगावी तंटामुक्त अध्यक्ष हे मानाचे पद म्हणून भूषविले जाऊ लागले. त्यातून या पदासाठी निवडणुका होऊन वादही झाले. काही गावात तर तंटामुक्त अध्यक्ष नको म्हणून ग्रामसभा तहकूब झाल्या. पण त्यातून गोर गरिबांचे होणारे किरकोळ तंटे पोलिस स्टेशन पर्यंत जाऊ लागले आहेत. शासनाने देखील तंटामुक्त गाव पुरस्कार योजना जवळपास बंद केल्याने समिती पदाधिकाऱ्यांनी समितीच्या कामाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते.
१५ आॅगस्ट २००७ला महात्मा गांधी तंटामुक्त मोहीम सुरू झाली. त्यातून न्यायव्यवस्थेवरील व पोलिसांवरील ताण देखील कमी झाला. अध्यक्ष पदावरूनच वाद झाल्याने गावात दोन गट निर्माण होऊ लागले. त्यातून या समितीची बदनामी होऊ लागली. सुरूवातीला प्रभावीपणे राबवली गेल्याने एक गाव एक पोलिस ही योजना देखील यशस्वी ठरली. शासनाने पुरस्कार बंद केल्याने मात्र पुन्हा ही योजना मंदावल्याचे दिसून येत आहे.
-बलवंत मांडगे, पोलिस निरीक्षक, रांजणगाव गणपती
पूर्वीपासून चावडीवर न्याय होऊन गावात तंटे मिटवले जायचे. त्याचाच आधार म्हणजे महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती तयार करण्यात आली होती. गावाच्या विकासासाठी एकत्रित येणारे लोक म्हणजे ‘एक गाव एक कुटुंब असे भासत होते. अलीकडे मात्र हे चित्र बदलल्याचे दिसून येत आहे.
-सुरेशकुमार राऊत, पोलिस निरीक्षक, शिरूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.