शेलू- भांबोली परिसरात धुराचे लोट
आंबेठाण, ता. ११ : चाकण औद्योगिक वसाहतीत उद्योगधंद्यांतून निघालेला कचरा मोठ्या प्रमाणात जाळला जात असून, त्यामुळे दिवसागणिक प्रदूषण वाढत आहे. शेलू- भांबोली (ता. खेड) गावच्या सीमेवर अशाच प्रकारे कंपन्यांचा कचरा टाकला जात असून, रात्रीच्या वेळी तो पेटवून दिला जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषण होत आहे. यापूर्वी देखील या ठिकाणी असाच कचरा जाळला जात होता.
शेलू-भांबोली गावच्या सीमेवर असणाऱ्या रिकाम्या जागेत बुधवारी (ता. १०) रात्री साडेदहाच्या सुमारास अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात आला. त्यानंतर या कचऱ्याला आग लावण्यात आली. याचा परिणाम मोठ्या प्रमाणात धुराचे लोट हवेत पसरले होते. अगदी दुसऱ्या दिवशी १२ वाजेपर्यंत देखील हा धूर आजूबाजूच्या परिसरात पसरत होता. सकाळी सातच्या सुमारास, तर कचरा जाळलेल्या ठिकाणापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरापर्यंत हा काळाकुट्ट धूर हवेत पसरला होता. अगदी करंजविहिरे, वासुली गावापर्यंत हा धूर पसरत गेला होता. यामुळे आकाशात एका ठराविक उंचीवर या धुराचेच ढग तयार झाल्याचा अनुभव येत होता. सकाळच्या वेळी कामाला जाणारे कामगार यांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागला. तसेच शेलू, आसखेड खुर्द भागात मोठ्या प्रमाणात बागायती शेती केली जाते. या शेत पिकांना देखील याचा फटका बसू शकतो.
एमआयडीसी भागात कुठेही कचरा संकलनासाठी जागा उपलब्ध नसल्याने अनेक कारखानदार, ग्रामपंचायत मिळेल त्या ठिकाणी अशाप्रकारे कचरा टाकत आहे. या कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी कुठल्याही प्रकारची यंत्रणा नसल्याने ओला- सुका कचरा, केमिकल युक्त रसायने, प्लॅस्टिक असा एकत्रित कचरा टाकला जात आहे. तसेच, हा कचरा नष्ट करण्यासाठी याला आग लावली जात आहे.
कारखानदारांच्या असल्या चुकांमुळे परिसरातील नागरिक, तसेच कंपन्यांमध्ये काम करणारे कामगार यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे अशा प्रकारे कचरा टाकून त्याला आग लावणाऱ्या कारखानदार, उद्योजक यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करीत आहे.
आमच्याकडे यापूर्वी देखील अशा प्रकारच्या तक्रारी आल्या होत्या. हा गंभीर प्रकार असून, यामुळे स्थानिक नागरिकांसह कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे लवकरच आमचे अधिकारी या ठिकाणी भेट देतील आणि जे कोणी याला कारणीभूत असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
- नितीन गोरे, सदस्य, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळ
या ठिकाणी कचरा पेटवण्याचे नेहमीचे झाले आहे. याबाबत आम्ही संबंधित लोकांना सूचना देखील केल्या होत्या. मात्र, त्यांनी हा प्रकार बंद केला नाही. याचा त्रास आजूबाजूला असणारे आदिवासी ठाकर बांधव, तसेच शेलू ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे.
- समीर ठोंबरे, स्थानिक नागरिक, शेलू
03502
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

