slugआळंदी पालखी सोहळा दिंडीकरी बैठक/slug>

slugआळंदी पालखी सोहळा दिंडीकरी बैठक/slug>

मानाच्या प्रत्येक दिंडीत ९० वारकऱ्यांना प्रवेश

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याबाबत दिंडीकरी, प्रशासनाचा प्रायोगिक निर्णय

आळंदी, ता. ७ : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा निर्विघ्न पार पडावा, यासाठी पालखी प्रस्थानाच्या दिवशी देऊळवाड्यात प्रवेश देताना मानाच्या प्रत्येक दिंडीतील वारकऱ्यांची संख्या नव्वद करण्याचा प्रायोगिक निर्णय करण्यात आला आहे. प्रशासन आणि मानाच्या दिंडीकऱ्यांकडून यास एकमुखाने दुजोरा देण्यात आला. दरम्यान, प्रस्थान सोहळ्यास अनावश्यक गर्दी कमी करण्यासाठी राजकीय मंडळी, प्रशासन आणि मीडियाच्या संख्येवर कमालीचे नियंत्रण घालण्यात येणार आहे.
प्रस्थान सोहळ्याच्या नियोजनाबाबत शुक्रवारी (ता. ७) आळंदी देवस्थानच्या भक्त निवासात बैठक झाली. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पालखी सोहळाप्रमुख योगी निरंजननाथ, डॉ. भावार्थ देखणे, पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, प्रांताधिकारी जोगेंद्र कटारे, सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र गौड, राजाभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार, राणू महाराज वासकर, भाऊसाहेब गोसावी, भाऊ महाराज फुरसुंगीकर, मारुती कोकाटे यांच्यासह दिंडी चालक-मालक उपस्थित होते.
महेंद्र महाजन म्हणाले, ‘‘मागील दोन वर्षांत पालखी सोहळ्याला काही कारणाने गालबोट लागले आहे. प्रशासनाच्या दृष्टीने सोहळा सुखरूप तसेच नियंत्रणात ठेवण्यासाठी मागील वर्षी प्रस्थान सोहळ्याच्या दिवशी प्रत्येक दिंडीतील ७५ वारकऱ्यांना मर्यादित प्रवेश दिला होता. देऊळवाड्यातील परिसर कमी असल्याने तेथे चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी दिंड्यांमधील वारकऱ्यांना मर्यादित प्रवेश दिला होता. देऊळवाड्याच्या प्रांगणात चार हजार २५० वारकरी बसू शकतात, अशी आकडेवारी प्रशासनाने निश्चित केली होती. प्रत्येकाला मंदिरात जाण्याची इच्छा असते. वारकरी विद्यार्थी आणि पोलिस यामध्ये हुज्जत झाली. त्यावेळी लाठीमारासारखी घटना घडली. हा सोहळा सुरळीत पार पाडावा, यासाठी मानाच्या दिंड्यांतील वारकरी संख्या ९० करणे आवश्यक आहे.’’
डॉ. शिवाजी पवार म्हणाले, ‘‘मागील वर्षी पोलिसांबाबत वारकऱ्यांमध्ये समज-गैरसमज झाले होते. सोहळा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने वारीचे मार्गक्रमण, परंपरा जाणून घेण्याची भूमिका पोलिसांची असते. प्रत्येकाला वारीचे क्षण अनुभवायचे असतात. गेल्या तीन वर्षांपासून गर्दीवरील नियंत्रण नियोजनाबाहेर जात आहे. चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी मानाच्या ४७ दिंड्या आणि नऊ उपदिंडी अशा ५६ दिंड्यांतील वारकऱ्यांची संख्या मर्यादित असावी. प्रस्थानाच्या दिवशी देऊळवाड्यात पोलिसमित्रही नसतील. पोलिस, महसूल प्रशासनातील अनावश्यक मंडळींना प्रवेशासाठी बंधन घातले जाईल. प्रशासनातील हस्तक्षेप कमीत कमी राहण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.’’
बाळासाहेब चोपदार म्हणाले, ‘‘प्रशासनाने मागील वर्षी प्रयोग करू, असे सांगितले होते. त्याप्रमाणे आम्ही भावनांना मुरड घातली. मात्र, आता संख्या वाढवावी. हा आनंद, प्रथा, परंपरेचा सोहळा आहे. यामुळे नियमाचा व परंपरेचा मेळ घालावा.’’

‘लाठीमार घटनेची सखोल चौकशी करावी’
राणू महाराज वासकर म्हणाले, ‘‘प्रशासनास सहकार्य म्हणून वारकरी तयार आहेत. मात्र, पालखी सोहळ्यात प्रशासनाचे नियंत्रण सुरू झाल्यापासून सोहळ्यात बेशिस्तपणा येऊ लागला आहे. वर्षानुवर्षे आम्ही स्वतःहून बंधन घालत आहोत. वारीत पोलिसांबरोबर जास्त लोक असतात. तसेच मागील वर्षीच्या गोंधळाची सखोल चौकशी व्हावी. त्या घटनेचा वारकरी, प्रशासनाला डाग नको. नऊ हजार लोक मंदिरात बसतात. संख्येबाबत थेट निर्णय नको. पुढील वर्षीही प्रयोग करावा. मीडियाची संख्या जास्त असते. दरवर्षी भीतीदायक वातावरण नको. अंतिम निर्णय संस्थानचा आहे.’’

बैठकीतील महत्त्वाचे निर्णय...
- प्रस्थान दिवशीच्या दिवशी देऊळवाड्यात मानाच्या ४७ आणि नऊ उप दिंडीतील प्रत्येकी नव्वद वारकऱ्यांना प्रवेश द्यावा
- प्रशासनातील कर्मचारी, पोलिसमित्र, छायाचित्रकार, मीडिया यांच्या प्रवेशावर निर्बंध आणणार
- वारकऱ्यांना मंदिर प्रवेश पास प्रस्थानाच्या दोन दिवस आधी
चोपदार आणि संस्थानकडून देणार
- प्रस्थानाच्या दिवशी देऊळवाड्याच्या ओवऱ्यां‍मध्ये बसू दिले जाणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com