शुभमंगलचे मुहूर्त यंदा कमीच

शुभमंगलचे मुहूर्त यंदा कमीच

Published on

आळंदी, ता. १ : तुळशी विवाहानंतर लग्नाचे मुहूर्त सुरू होतात. मात्र यंदाच्या वर्षी गुरू शुक्राचा अस्त असल्याने मुहूर्त कमी आहेत. नोव्हेंबरमध्ये केवळ शेवटच्या आठवड्यात, डिसेंबरला केवळ चारच मुहूर्त तर शुक्राच्या अस्तामुळे जानेवारीमध्ये मुहूर्तच नाहीत. ३ फेब्रुवारीपासून लग्नाचे मुहूर्त सुरू होत असल्याची माहिती आळंदीतील चिंतामणी ज्योतिष मंगल कार्यालयाचे पुरोहित संदीप कुलकर्णी यांनी दिली.
कुलकर्णी म्हणाले, ‘‘पंचांगानुसार यंदाच्या वर्षी १६ आक्टोबर ते ७ डिसेंबर कालावधीत गुरूचा अस्त आहे. तर ७ डिसेंबर ते ५ फेब्रुवारी दरम्यान शुक्राचा अस्त आहे. यामुळे नोव्हेंबरमध्ये १४, १८, २२, २३, २४, २६, २८, ३० तर डिसेंबरमध्ये २, १२, १३, १५ एवढ्याच मुहूर्ताच्या तारखा पंचांगात दर्शविण्यात आल्या आहेत. जानेवारी महिन्यात शुक्राच्या अस्तामुळे मुहूर्त नाहीत. ३ फेब्रुवारीपासून जून महिन्यापर्यंत लग्नाचे अनेक मुहूर्त आहेत. तर २६ जुलैला पुन्हा गुरूचा अस्त होत असल्याने लग्नाचे मुहूर्त नाहीत. याचबरोबर जूनमध्ये अधिक महिना असल्याने लग्नकार्ये केली जात नाहीत.’’
फेब्रुवारी महिन्यात ३, ५, ६, ७, ८, १०, ११, १२, २०, २२, २५, २६ एवढे मुहूर्त आहेत. तर मार्च महिन्यात ५, ७, ८, १२, १४, १५, १६ एप्रिल महिन्यात २१, २६, २८, २९, ३० एवढेच मुहूर्त आहेत. एप्रिल महिन्यात चैत्र महिना आणि शालेय परीक्षांचा कालावधी असल्याने तुलनेने विवाह कमी होत आहेत.
गुरू शुक्र अस्ताचा परिणाम आळंदीतील विवाहावर होत आहे. आळंदीतील शंभरहून अधिक मंगलकार्ये विविध पुरोहित तसेच तरुणाई चालवितात. लग्नकार्ये ही आळंदीत उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे. मात्र मुहूर्तावर लग्न करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यातच कार्तिक वारी नोव्हेंबर महिन्यात १२ ते २० तारखेपर्यंत असल्याने अनेक धर्मशाळा वारकऱ्यांच्या दिंड्यांसाठी रिकाम्या ठेवाव्या लागतात. याचाही परिणाम विवाह नोंदणीवर झाल्याचे दिसून येत आहे.

तुळशीच्या लग्नानंतर मुहूर्त सुरू होतात. मात्र सुरुवातीलाच मुहूर्ताच्या तारखा कमी असल्याने मंगल कार्यालय बुकिंगला थंडा प्रतिसाद आहे. जेवणासह लग्न असेल तर कार्यालयांना परवडते. मात्र अशी लग्नांचं बुकिंग कमी होते आहे. कार्तिक वारीनंतर बुकिंगला सुरूवात होण्याची आशा आहे.
- गिरीश तुर्की, संचालक, विठ्ठलकृपा मंगल कार्यालय

प्रेम विवाह करणाऱ्यांच्या लग्नांची संख्या अधिक आहे. यामध्ये मात्र किरकोळ फायदा होतो. जेवणासह बुकिंग असलेले विवाह कमी आहेत. गुरू शुक्राच्या अस्तामुळे संख्या रोडावली आहे. सध्या मुहूर्त पाहून लग्न करण्याची संख्या वाढली आहे. तर काही ठिकाणी पळून जाऊन विवाह करणाऱ्यांची संख्या वाढल्याने आळंदीत काही ठिकाणी व्यवसाय कमी अधिक प्रमाणात सुरू आहेत. मुहूर्ताची लग्ने मात्र यंदा कमी आहेत.
- संकेत वाघमारे, पुरोहित, भाग्यश्री मंगल कार्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com