कार्तिकी वारीस प्रारंभ, तरी खड्डे बुजलेच नाहीत
आळंदी, ता. १२ : कार्तिकी वारीला आळंदीतील रस्त्यातील खड्डे भरून घ्या, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २६ ऑक्टोबरला आळंदीमध्ये नगरपरिषद प्रशासनाला सांगितले. सोबत दोन दिवसांतच नगर विकास विभागाकडून रस्ता विशेष अनुदान निधीतून एक कोटी रुपयांचा निधी पुणे-आळंदी रस्त्यासाठी दिला. मात्र, वारकरी आळंदीत पोहोचले तरी आळंदीतील रस्त्यांवरील खड्डे काही भरले नाही. ऐन वारी काळातच निवडणूक आचारसंहिता लागल्याने विशेष रस्ता अनुदानातील एक कोटींचा निधी वापरता येत नसल्याचे चित्र आहे.
कार्तिकी वारीसाठी मागील दोन दिवसांपासून वारकऱ्यांचा ओघ सुरू झाला. पंढरपुरातून विविध फडकारांच्या दिंड्या आळंदीत आल्या. सोबत पांडुरंग परमात्म्याच्या पादुका आणि श्री संत नामदेव यांची दिंडी सोहळा आळंदीत दाखल झाला. मात्र, आळंदीतील रस्त्यांमध्ये खड्डे काही प्रशासनाने भरले नाहीत. पुणे-आळंदी रस्त्यावरून आळंदीत प्रवेश करताच धुळीचे साम्राज्य आणि खड्ड्यांचे चित्र पाहायला मिळत आहे. तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खड्ड्यांवरून नाराजी दर्शवली होती. तसेच कार्तिकी यात्रेपूर्वी रस्त्यातील खड्डे चांगले करून घ्या, असे सुनावले ही होते. मात्र, कोणाचे ऐकेल ते प्रशासन काय हा अनुभव वारकऱ्यांना आणि आळंदीकरांना आला.
बैठकीचा केवळ फार्स का?
वारीच्या नियोजनाच्या बैठका प्रांत अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली होतात. विविध प्रशासकीय अधिकारी या बैठकीला उपस्थित असतात. मात्र, बैठकीनुसार कामे होतात की की नाही याची चाचपणी कोण करणार? आचारसंहितेमुळे एक कोटी निधीतून काम करता येत नसले तरी अन्य काहीच सोय तत्काळ केली गेली नाही. प्रांत अधिकारी आणि विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका वारीच्या नियोजनासाठी होतात; मात्र हा फार्स आहे का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. सध्या चाकण चौक देहू फाटा आळंदी-पुणे रस्ता या भागामध्ये खड्ड्यांची जंत्री दिसून येते. तात्पुरत्या स्वरूपात खड्ड्यांची दुरुस्ती होते; मात्र वारीच्या आधी ती पण झाली नाही. यामुळे पायी चालताना धूळ आणि खड्ड्यांचा तसेच अधूनमधून खडी पायाला टोचत आहेत. आता वारकऱ्यांची गर्दी होऊ लागल्याने कामाला सुरुवात करणार का, असा सवाल प्रशासनाला विचारला जात आहे.
आचारसंहितेमुळे रस्ता विशेष अनुदानातील एक कोटी निधीतून काम करता येत नाही. यामुळे वारकऱ्यांची कोणती गैरसोय होणार नाही याची दक्षता नगरपालिका प्रशासन घेणार आहे. रात्री सर्व खड्डे डांबराने बुजविले जातील. वारी आणि निवडणूक झाल्यानंतर एक कोटी अनुदानातून रस्त्याचे पूर्ण डांबरीकरण केले जाईल.
- माधव खांडेकर, मुख्याधिकारी, आळंदी नगरपरिषद
06703
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

