आंबेगाव तालुक्यातील शेतकरी अडचणीत

आंबेगाव तालुक्यातील शेतकरी अडचणीत

Published on

पारगाव, ता. ९ : आंबेगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पश्चिम भागातील भात पिकाला, तसेच पूर्व भागातील तरकारी पिके व सातगाव पठार, शिरदाळे परिसरातील पावसाळी बटाटा पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. शासनाकडून मिळणारी मदत ही तुटपुंजी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
यावर्षी प्रथमच मे महिन्यापासून पडायला लागलेला पाऊस ऑक्टोबरपर्यंत म्हणजे जवळजवळ सहा महिने पाऊस पडत राहिला. खरीप हंगामात पश्चिम भागात मुख्य पीक भात आहे. मात्र, यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने भात पिके भुईसपाट झाली, तर आता काढणीला आलेल्या भात पिकाच्या शेतात अद्याप पाण्याची तळी असल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास वाया जाणार आहे.
सातगाव पठार भागात, तसेच शिरदाळे पठार भागात पावसाळी बटाटा पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सुरुवातीला अनेक दिवस पाऊस लागून राहिल्याने बटाटा लागवडीला उशीर झाला. त्यामुळे लागवडीसाठी आणलेले बटाटा बेणे घरात अनेक दिवस पडून राहिल्याने मोठ्या प्रमाणात सडले. बटाटा काढणी सुरू असतानाही पाऊस सतत पडत होता. त्यामुळे काढलेले बटाटेही शेतात साचलेल्या पाण्यामुळे सडण्याचा धोका वाढला आहे, असे शिरदाळे येथील बटाटा उत्पादक शेतकरी संदीप तांबे व मयूर सरडे यांनी सांगितले.

आंबेगाव तालुक्यातील एकूण बाधित क्षेत्र
माहे जिराईत बागायत फळपिक एकूण क्षेत्र हे.
सप्टेंबर १०५५.७६ २२९.४७ ६८.१५ १३५३.३८
ऑक्टोबर १४६९.९८ ००.०० ८०.१७ १५५०.१५

माहे सप्टेंबर २०२५ मध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी अनुदान प्राप्त झालेले असून, हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येत आहे. तसेच, ऑक्टोबर २०२५ मध्ये अवकाळी पावसामुळे पश्चिम पट्यात भात पिकाचे नुकसान झाले असून, त्याचे पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना मदत करण्यात येणार आहे.
- सिद्धेश ढवळे, तालुका कृषी अधिकारी, आंबेगाव

यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने अति पाऊस, तसेच सूर्य प्रकाशाचा अभाव यामुळे तरकारी पिकावर मोठ्या प्रमाणात करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला. रब्बी हंगामात कांदा लागवड करण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी शेतात कांद्याची रोपे टाकळी होती, त्याचे पावसामुळे ५० टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे. फुलांची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतातील झेंडूच्या फुलांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने फुलांना काळे डाग पडले. मात्र, अलीकडच्या काही दिवसात झालेला पाऊस रब्बी हंगामातील ज्वारी, गहू व हरभरा पिकासाठी उपयुक्त ठरणार आहे.
- महेंद्र वाळुंज, शेतकरी, वाळुंजनगर

06308

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com