भूसंपादन करा, मगच अतिक्रमणे काढा
चाकण, ता. ११ : खेड तालुक्यातील चाकण- आंबेठाण मार्गावर आंबेठाण चौक ते चाकण नगर परिषदेच्या हद्दीत चाकण- आंबेठाण रस्त्यालगतच्या जमिनीचे कायदेशीर मार्गाने भूसंपादन करावे, शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला द्यावा, त्यानंतरच अतिक्रमण कारवाई करावी. रस्ताही किती मीटरचा करा, पण शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला देऊन करा, अशी आग्रही मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंता भाग्यश्री गिरी यांना निवेदन देऊन केली.
चाकण येथे सध्या नगरपरिषदेच्या हद्दीतील अतिक्रमण कारवाई सुरू झालेली आहे. चाकण येथील पुणे- नाशिक महामार्गावरील आंबेठाण चौक ते आंबेठाणकडे जाणाऱ्या मार्गावर चाकण नगर परिषदेच्या हद्दीत दोन किलोमीटर अंतर दोन्ही बाजूने अतिक्रमण कारवाई करण्यात येणार आहे. कारवाई करताना अनेक स्थानिक शेतकऱ्यांची दुकाने, घरे त्यात येत आहेत. त्यामुळे स्थानिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. अतिक्रमण कारवाई करा, परंतु ज्या शेतकऱ्यांची दुकाने, घरे, जागा त्यात जात आहेत, त्यांना भूसंपादनाचा मोबदला मात्र द्या, अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांची व स्थानिकांची आहे.
या मागणीसाठी शेतकरी, स्थानिकांनी झित्राईमळा ते चाकण नगरपरिषद कार्यालय, असा हातात फलक घेऊन निषेध मोर्चा काढला. या फलकावर शेतकऱ्यांच्या व्यथा मांडलेल्या होत्या. शासनाला या फलकातील घोषवाक्यातून सूचित केले होते. मागण्यांचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंता भाग्यश्री गिरी यांना देण्यात आले. यावेळी बाधित शेतकऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी विचार व्यक्त केले. त्यानंतर मोर्चाची सांगता झाली.
या मोर्चात सामाजिक कार्यकर्ते संजय गोरे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे, बाळासाहेब गायकवाड, बाजार समितीचे माजी संचालक राम गोरे, चाकण शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राम गोरे, खेड बाजार समितीचे संचालक महेंद्र गोरे, प्रवीण गोरे, महेश शेवकरी, चंद्रकांत गोरे, पांडुरंग गोरे, जमीरभाई काझी, मुबीन काझी, स्वप्नील गोरे, प्रकाश भुजबळ, अनिल देशमुख, अशोक जाधव, उमेश गोरे, प्रवीण नायकवाडी, सुनील शेवकरी, शोभा शेवकरी व इतर कार्यकर्ते , महिला आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी चाकणचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय सोळंके व इतर पोलिसांचा बंदोबस्त होता.
याबाबत सामाजिक कार्यकर्ते संजय गोरे म्हणाले, ‘‘चाकण- आंबेठाण मार्ग हा जुना आहे. सध्या तो फक्त तीस फूट रुंदीचा आहे. मार्गाच्या दोन्ही बाजूला स्थानिकांची घरे, बंगले दुकाने, जागा आहेत. हा मार्ग वाढवताना ज्या शेतकऱ्यांची जमीन, दुकाने, घरे, जागा या मार्गात जात आहेत, त्याचे भूसंपादन करून शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला द्यावा. शेतकऱ्यांचा विकास कामाला विरोध नाही, परंतु जमिनीचा मोबदला देऊन कामे करावीत अतिक्रमणे काढावीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही.’’
शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार केला जाईल. याबाबत वरिष्ठांना माहिती पाठवली जाईल. सध्या हा मार्ग २५ मीटर रुंदीचा आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही केली जाईल."
- भाग्यश्री गिरी, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.