भातावर कडा करपा, तांबेऱ्याचा प्रादुर्भाव
चास, ता. ४ : भोरगिरी भिवेगांव तसेच परिसरातील (ता. खेड) भागात भाताच्या पिकावर कडा करपा तसेच तांबेरा रोगाची प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे पिकाची पाने करपली आहेत. यामुळे उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
प्रादुर्भाव रोखण्यासाठी तातडीने पिकावर औषधांची फवारणी करून रोगाचा प्रभाव कमी करण्याची गरज आहे. मात्र, कृषी विभागाचे अधिकारी शेतांमध्ये येऊन मार्गदर्शनच करत नसल्याने गेली काही वर्षापासून सातत्याने भातपिकावर या रोगाचा प्रादूर्भाव होत असल्याने शेतकरी हताश झाले आहेत.
खेड तालुक्याचा पश्चिम पट्टा हा खरीप हंगामात भाताच्या पिकासाठी प्रसिद्ध आहे. वाडा मंडलमध्ये सुमारे ३१४० हेक्टर क्षेत्रावर लागवड झालेली आहे. गेली काही दिवसांपूर्वी पावसाने अचानक विश्रांती घेत कडक ऊन पडल्याने भात पिकावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होऊन काही ठिकाणी बुरशीजन्य रोगाची लागण झाली आहे. त्यानंतर पडणारा रिमझीम पाऊस, धुके, यामुळेही पिकावर विपरीत परिणाम झाला आहे. या भागातील पाभे, भोमाळे, भोरगिरी, भिवेगांव, टोकावडेच्या काही भागात भाताच्या पिकावर कडा करपा या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. काही भागात तांबेरा रोगाचा प्रादूर्भाव दिसून येतो आहे. हा रोग जीवाणूजन्य असून साधारणत फुटवे फुटणे ते लोंब्या निसवण्याच्या काळात या रोगाचा प्रादुर्भाव होतो. या रोगात सुरुवातील पानांचे शेंडे आणि कडा फिकट हिरवट होऊन करपतात. या रोगाचा जास्त प्रादूर्भाव झाल्यास चुडांची संपूर्ण पाने करपतात व भात पीक जागच्या जागी बसते.
दरम्यान रोगाचा प्रसार लागवडीसाठी रोगग्रस्त बियाणे, रोगग्रस्त अवशेष, बांधावरील तण, वाहणारे पाणी यामधून होत असतो. या रोगामुळे पीक फुलोऱ्यात वा ओंब्या भरल्या न गेल्याने उत्पन्नात मोठी घट होते. गेली काही वर्षांपासून सातत्याने या भागात या रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असताना कृषी विभागामार्फत कोणत्याही उपाययोजना करण्यात येत नसून शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन मार्गदर्शन केले जात नाही, असा आरोप कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व संचालक विठ्ठल वनघरे यांनी केला आहे.
दरम्यान, काही वर्षापूर्वी वाडा मंडळ कृषी विभागाचे कार्यालय वाडा येथे असताना शेतकऱ्यांना मार्गदर्शन होत असे शिवाय कृषी विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन मार्गदर्शन करत होते. योजनांची माहिती दिली जायची. मात्र आता कार्यालय बंद झाले असून तालुक्याच्या ठिकाणी अधिकारी बसतात व शेतकऱ्यांना त्यांच्याकडे जाऊन माहिती घ्यावी लागते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
03782
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.