नव तंत्रज्ञानाची कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे

नव तंत्रज्ञानाची कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे

Published on

इंदापूर, ता. २ ः नव तंत्रज्ञानाच्या युगात आंतरराष्ट्रीय परिषदा आयोजित करणे गरजेचे आहे. तंत्रज्ञान टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करणे अत्यावश्यक असून आगामी ट्रेंड्स आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या उद्दिष्टांशी सुसंगत विविध अभ्यासक्रमांची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.
राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) २०२० अंतर्गत शैक्षणिक पद्धतीत व्यापक बदल सुचविण्यात आले असून विद्यार्थी-केंद्रित दृष्टीकोनावर भर देण्यात आला. या धोरणानुसार २०४० पर्यंत सर्व उच्च शिक्षण संस्था बहुआयामी बनाव्यात असे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. या पार्श्वभूमीवर ग्लोबल फाउंडेशन, इंडिया यांच्या सहकार्याने इंदापूर महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभाग, वाणिज्य विभाग आणि आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘तंत्रज्ञान आणि शाश्वततेमधील आगामी प्रवाह’ या विषयावर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय ई-परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी पाटील बोलत होते.
या परिषदेची सुरुवात विज्ञान विभाग प्रमुख डॉ. शिवाजी वीर यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. त्यानंतर परिषदेच्या संयोजिका डॉ. मनिषा गायकवाड यांनी आंतरराष्ट्रीय ई-परिषदेचा उद्देश स्पष्ट केला. डॉ. भरत भुजबळ यांनी ओळख करून दिली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष तसेच पिंपरी चिंचवड विद्यापीठ, पुणे कुलपती हर्षवर्धन पाटील यांचे मनोगत झाले.
या उद्घाटन सत्राचे प्रमुख वक्ते अल-कुड्स ओपन युनिव्हर्सिटी, पॅलेस्टीन येथील सहाय्यक प्राध्यापक डॉ. मुन्थर मोहम्मद इब्राहिम झ्यौद होते. त्यांनी शाश्वत तंत्रज्ञान तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा शिक्षण क्षेत्रावर होणारा परिणाम याबाबत मार्गदर्शन केले. या सत्रासाठी डॉ. आर. आर. भोसले यांनी प्रतिनिधींचा परिचय करून दिला, तर प्रा. मुक्ता पिसे यांनी आभार मानले.
पहिल्या सत्रात संसाधन व्यक्ती म्हणून ज्ञान संसाधन केंद्र, मॉडर्न आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, पुणेच्या ग्रंथपाल डॉ. संगीत धमढेरे यांनी नवीन तंत्रज्ञानाचे विविध पैलू आणि त्याचा शिक्षण क्षेत्रावर, विशेषतः ग्रंथालय व माहिती शास्त्रावर होणारा प्रभाव स्पष्ट केला. या सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. मनिषा जाधव होत्या. डॉ. तानाजी कसबे यांनी आभार मानले.
दुसऱ्या सत्रात महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदा (गुजरात) येथील प्रा. डॉ. दृष्टी भद्रेश जोशी यांनी वाणिज्य व व्यवस्थापनातील शाश्वत तंत्रज्ञानावर प्रकाश टाकला. ब्लॉकचेन, ई-कॉमर्स, ई-ट्रेड यांसारख्या नव्या प्रवाहांवर त्यांनी सविस्तर चर्चा केली. या सत्राचे अध्यक्ष डॉ. सदाशिव उंबरदंड होते, तर डॉ. आत्माराम फलफले यांनी आभार मानले.
तिसऱ्या सत्रात संगमेश्वर महाविद्यालय (स्वायत्त), सोलापूर येथील भूगोल विभागाचे प्रा. डॉ. एस. एस. मस्के यांनी सामाजिक शास्त्रामधील नवीन प्रवाह, एआय तंत्रज्ञान तसेच त्याचा भूगोल व पर्यावरणावर होणारा परिणाम याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. गजानन ढोबळे हे अध्यक्षस्थानी होते, तर डॉ. संदीप शिंदे यांनी आभार मानले.
या परिषदेदरम्यान सहभागी संशोधक व संशोधन विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या एकूण ५२ शोधनिबंधांसाठी तांत्रिक सत्र १ व २ आयोजित करण्यात आले होते. डॉ. सुरेंद्र शिंदे या सत्रांचे अध्यक्ष होते. प्रा. दिव्या जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर, डॉ. मृदुला कांबळे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com