खेडमधील डोंगरांना वणव्यांचे ग्रहण

खेडमधील डोंगरांना वणव्यांचे ग्रहण

कडूस, ता. १० : खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील डोंगररांगा सध्या आगीत जळून काळ्याठिक्कर पडल्या आहे. हजारो हेक्टर जंगल क्षेत्र जळून खाक झाले असून, वनसंपदेची मोठी हानी झाली आहे. वन्यजीवांचा निवाराही नष्ट झाला आहे.

खेडच्या पश्चिम पट्ट्यातील डोंगरातील जंगलांना उन्हाळ्यात आगी लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यात खासगी क्षेत्रातील डोंगरांना आगी लावण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. चासकमान धरण जलशयालगतच्या दोन्ही बाजूंच्या लांबचलांब डोंगररांगा, वेताळे, सायगाव, साबुर्डी, साकुर्डी, कहू-कोयाळी, कडूस, कोहिंडे, वाजवणे गावांच्या लगतचे डोंगर वणव्यात जळून गेले आहेत. डोंगरांना वणवे लावल्यास पावसाळ्यात अधिक चांगल्या प्रमाणात नवीन गवत उगवते, हा स्थानिक नागरिकांमध्ये समज प्रचलित असल्याने पुढील हंगामात चांगले गवत उपजावे यासाठी अनेकवेळा असे वणवे लावले जातात. वन विभागाच्या, तसेच मालकीच्या डोंगरांना वणवे लावण्याचे प्रकार वाढले आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी वणवे लावले जातात. बहुतांश ठिकाणी जाणूनबुजून आगी लावल्या जातात. हाच वणवा वनविभागाच्या हद्दीत जाऊन तालुक्यातील वनक्षेत्र खाक झाले आहे. यात वनसंपदेची मोठी हानी झाली आहे. वन्यजीवांचा निवाराही नष्ट होत आहे, असे यादवराव शिंदे यांनी ''सकाळ''शी बोलताना सांगितले.


भीमाशंकर अभयारण्यालगतच्या गावांमध्ये काहीजण शिकारीसाठी डोंगरांना आगी लावतात. वणव्यातून जीव वाचवण्यासाठी हे प्राणी सैरावैरा मार्ग दिसेल तिकडे धावतात. शिकारी टोळ्या या पळणाऱ्या प्राण्यांची हत्या करतात. वनसंपत्तीचे संवर्धन करण्यासाठी जंगलाला लागणाऱ्या आगींच्या घटनांवर अंकुश ठेवणे गरजेचे आहे, त्यासाठी स्थानिक पातळीसह शासकीय स्तरावरून प्रामाणिक प्रयत्न व्हायला हवेत.
- मिलिंद शिंदे, रानमळा, निसर्ग प्रेमी


जनजागृती करण्यात वनविभाग अपयशी
जंगले पेटवून देण्याचे प्रमाण वाढले आहे.त्याला अटकाव करण्यासाठी वनविभागाने प्रभावी उपाययोजना करायला हव्यात. आग नियंत्रणात आणण्यासाठी जाळपट्टे वेळेत आणि आवश्‍यक त्या ठिकाणी काढायला हवेत. आग न लावण्याबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हायला हवी. वनकर्मचाऱ्यांचा लोकांशी संपर्क कमी झाला आहे. ग्रामसभेला त्यांची उपस्थिती नसते. वनकर्मचाऱ्याचे दर्शन दुर्मिळ झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तर स्थानिकांचे सहकार्य व मदत मिळविण्यात वनकर्मचाऱ्यांना अपयश येत आहे.

हक्क असलेले डोंगर जळाले आहेत. तालुक्यात वनविभागाच्या हद्दीत आगीच्या आठ घटना घडल्या असून त्यात वीस हेक्टर क्षेत्र जळाले आहे. गायरान व मालकी क्षेत्र जळण्याचे प्रमाण जास्त आहे. गायरान व मालकी क्षेत्राबाबत तलाठ्याने गुन्हा दाखल केला पाहिजे. याबाबत तहसील कार्यालयाकडे पत्र पाठवणार आहे.
-प्रदीप रौन्धळ, वनपरिक्षेत्र अधिकारी, राजगुरुनगर

01018

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com