पुलाअभावी घरात शिरले पाणी
कळस, ता. २५ ः नव्याने काँक्रिटीकरणात बांधण्यात येणाऱ्या रस्त्यावर कळस (ता. इंदापूर) येथील बागवाडी परिसरात पुलाचे काम न झाल्याने ग्रामस्थांच्या घरात पावसाचे पाणी शिरत आहे. पूर्वी असणारा जीर्ण पूल काढून टाकण्यात आला आहे.
याठिकाणी नवीन पूल होणे अपेक्षित आहे. मात्र, कामादरम्यान पूल बांधण्यास लगतच्या शेतकऱ्यांनी विरोध केल्याने सध्या येथील ग्रामस्थांच्या घरात पावसाचे पाणी शिरत आहे. रस्त्यावर पूल बांधण्याबरोबर येथे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी चारी खोदून पाणी वाहून जाण्याची सोय करण्याची मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत.
याबाबत येथील ग्रामस्थ धनंजय खटके यांनी सांगितले की, येथे करण्यात येणाऱ्या क्राँक्रीट रस्त्याच्या कामादरम्यान छोटा पूल बांधण्याची गरज होती. रस्त्याच्या अंदाजपत्रकात कामाचा उल्लेख होता. मात्र, काही ग्रामस्थ, शेतकऱ्यांनी विरोध केल्यामुळे येथे पूल बांधण्याचे ठेकेदाराने टाळले आहे. परिणामी खटकेवस्तीवरील काही कुटुंबांना पावसाच्या पाण्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे डोंगराहून वाहून येणारे पाणी काहींच्या शेतीतून घरात शिरत आहे. यामुळे प्रापंचिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. संबंधित बाब तहसीलदारांच्या कानावर घातली. यानंतर येथे मंडलाधिकारी, तलाठी, ग्रामविकास अधिकारी, पोलिस पाटील यांनी येऊन पाहणी केली आहे. मात्र, पुलाअभावी ही समस्या कायम राहणार आहे. येथे तातडीने पूल बांधण्याबरोबर रस्त्याच्या दोन्ही बाजूने पाणी वाहून जाण्यासाठी चारी खोदण्याची गरज आहे.
याबाबत महाराष्ट्र राज्य इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदनाद्वारे पूल बांधण्याची मागणी करण्यात आल्याचे खटके यांनी सांगितले.
कायदेशीर कारवाई गरजेची
अकोले- कळस- शेळगाव व डाळज- कळस- वालचंदनगर या दोन्ही रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सध्या सुरू आहे. रस्त्याच्या कामात अनेकांनी अडथळा आणल्याचे बोलले जात आहे. मात्र, केवळ निविदा मंजूर झाले की ठेकेदाराने कामास सुरवात करणे हेच सूत्र रस्त्याच्या कामात आढळून आले आहे. ज्या विभागाकडून रस्त्याच्या कामास मंजुरी मिळाली आहे, त्या संबंधित विभागाबरोबर महसूल अधिकारी व पोलिस यंत्रणेकडून रस्त्याच्या रुंदीकरणासाठी लागणारी जागा निश्चित करणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे मत आहे. या दरम्यान जाणीवपूर्वक अडचण निर्माण करणारे, अतिक्रमण केलेले, विनाकारण त्रास देणारे यांच्यावर नियमानुसार कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे. लोकांच्या समस्या जाणून त्यावर तोडगा काढण्याची जबाबदारी नेमकी कोणाची हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.
03112
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.