रानभाज्या नामशेष होण्याच्या मार्गावर

रानभाज्या नामशेष होण्याच्या मार्गावर

Published on

पळसदेव, ता. १३ ः पावसाळ्याच्या सुरुवातीपासून ते उन्हाळ्यापर्यंत माळरानावर आणि शेतीच्या बागायती पट्ट्यात हमखास दिसणाऱ्या पौष्टिक रानभाज्या आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. एकेकाळी गरिबांची भूक भागविण्याबरोबर जेवणाच्या ताटाची चव वाढवणाऱ्या तांदुळजा, कुंजीर, रामाठ, पाथरी, सराटा, कुळई यांसारख्या काही राजनभाज्या शोधूनही सापडत नसल्याची स्थिती आहे.
लोह, प्रथिने आणि खनिजांचा मुबलक साठा असणाऱ्या या रानभाज्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून फायदेशीर असतात. परंतु शेतात वाढलेला रासायनिक खते औषधांचा वापर या भाज्यांचे अस्तित्व धोक्यात आणण्यास कारणीभूत ठरत आहे. आधुनिक शेती पद्धतीमुळे तरुण पिढी या पारंपरिक भाज्यांपासून दुरावत चालली आहे.
गेल्या काही वर्षांपासून ग्रामीण भागातील पडीक जमिनीवर नागरिकरण वाढले आहे. याशिवाय पडीक जमिनींचे रूपांतर बागायत पट्ट्यात झपाट्याने झाले आहे. शेतातील तण नष्ट करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचा थेट परिणाम या भाज्यांवर झाल्याचे बोलले जात आहे. रानभाज्यांमध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असल्याने व त्या पचनास हलक्या असतात. शिवाय यामध्ये नैसर्गिक प्रथिने आणि तंतुमय पदार्थांचा साठा असतो. रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी आणि शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी ग्रामीण भागात या भाज्यांचा औषध म्हणून वापर केला जात असे.
तालुका कृषी अधिकारी दीपक गरगडे म्हणाले, ‘‘बदलत्या जीवनशैलीत रानभाज्यांचे आहारात स्थान असणे महत्त्वाचे आहे. वाढत्या शहरीकरणात परसबागेतही या भाज्या पिकवता येणे शक्य आहे. शेतकऱ्यांनी रानभाज्यांचे संवर्धन करण्याबरोबर पारंपरिक आहाराला प्राधान्य देणे काळाची गरज बनले आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com