‘दुष्काळी कळस’ ठरले घामाच्या सिंचनाने ‘गुलाबाचे गाव’
सचिन लोंढे : सकाळ वृत्तसेवा
कळस, ता. १४ : कधीकाळी दुष्काळी गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कळस (ता. इंदापूर) गावाला येथील गुलाब रोपांच्या निर्मिती व्यवसायाने ‘गुलाबाचे गाव’ अशी वेगळी ओळख करून दिली आहे. व्यवसायाच्या मर्यादित संधी, पाण्याअभावी शेती बागायत करण्यात येणाऱ्या अडचणींमुळे कमी पाण्यात चांगले उत्पन्न मिळवून देणाऱ्या व्यवसायाची येथील शेतकऱ्यांनी निवड केली. सुमारे ३० वर्षांपूर्वी एका शेतकऱ्याने सुरु केलेला गुलाब रोपवाटिकेचा व्यवसायाचा आज गावभर विस्तार झाला आहे. येथील शेकडो कुटुंबांचा रोपवाटिका हा प्रमुख व्यवसाय बनला आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्य खांद्याला खांदा लावून दिवसरात्र रोपनिर्मितीसाठी राबत असतात. या व्यवसायाच्या माध्यमातून वर्षभरात लाखोंची उलाढाल होत असून, अनेकांच्या आयुष्यात सुखाचा सुगंध दरवळू लागला आहे.
कळसे येथील कधीकाळी मुरमाड जमिनीवर कुसळे उगविणाऱ्या ठिकाणच्या मातीतून, आता गुलाब फुलू लागला आहे. या फुलणाऱ्या गुलाबांनी केवळ बागा सजवल्या नाहीत, तर अनेक कुटुंबांच्या प्रपंचामध्ये सुखाचा बहर आणला आहे. सध्या गावात लहान मोठ्या सुमारे ५० गुलाब निर्मितीच्या रोपवाटिका अस्तित्वात आहेत. यातून गावातील तरुण व महिलांना हक्काचा रोजगार मिळाला आहे. येथील गुलाबाची रोपे देशाच्या कानाकोपऱ्यात पोचली असून, सध्या गावाची ओळख गुलाब निर्मितीचे हब झाले आहे.
देशभरातून मागणी
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येथील गुलाबांच्या रोपांना चांगली मागणी आहे. गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश यांसह देशातील उत्तरेतील काही राज्यांमध्ये येथील गुलाबाची रोपे विक्री केली जातात. सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात व चांगल्या दराने विक्री होणाऱ्या बोर्डेक्स या वाणाच्या गुलाबांच्या रोपांची येथे गेल्या काही वर्षांपासून सर्वाधिक निर्मिती होत आहे. दरवर्षी येथील सुमारे ५० लाखांहून अधिक गुलाबांच्या रोपांची विक्री होते. पावसाळ्यापूर्वी अनेक शेतकरी रोपांची आगाऊ रक्कम देवून रोपे आरक्षित करतात.
तरुणांना गावातच रोजगार
या व्यवसायामुळे गावातील शेकडो तरुणांना गावातच रोजगार मिळाला आहे. रोप निर्मितीच्या कामात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असल्याने, रोप विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर प्रपंचाचा गाडा चालविला जात आहे. परिणामी अनेक महिलांना आर्थिक स्वावलंबनाची संधी मिळाली असून, त्यांच्या कुटुंबाच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडत आहे. एकेकाळी रोजगारासाठी शहरांकडे जाणारी तरुण पिढी आज गावातच हा उद्योग उभारत आहे. परिश्रम, कौशल्य आणि जिद्दीच्या जोरावर ग्रामीण भागातील तरुणांनी शेतीला रोपवाटिकेची दिलेली जोड इतरांना प्रेरणा देणारी आहे.
रोपवाटिकेच्या व्यवसायाने गावातील शेकडो कुटुंबांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करून दिले आहे. या व्यवसायातून गावातील सुमारे २०० तरुण व महिला कामगारांना स्थानिक पातळीवर हक्काचा रोजगार मिळाला आहे. दरवर्षी रोपवाटिकांच्या माध्यमातून ५० लाखांच्या आसपास गुलाब रोपांची निर्मिती केली जाते. त्याची देशभर विक्री होते. सध्या बोर्डेक्स वाणाच्या गुलाब रोपांना शेतकऱ्यांकडून चांगली मागणी आहे. या फुलांना बाजारात हमखास चांगला दर मिळत असून, या गुलाबाची रोपे शेडनेट व उघड्या जमिनीवरही चांगली पोसली जातात. यामुळे या रोपांची आगाऊ मागणी शेतकऱ्यांकडून होते.
- गणेश आटोळे, रोपवाटिकेचे मालक
फुलशेतीकडेही अनेकांचा कल
बारमाही हक्काच्या पाण्याचा आधार नसलेल्या अनेक शेतकऱ्यांना आता जास्त पाणी लागणाऱ्या पिकांना फाटा देवून, फुलशेतीचा पर्याय निवडला आहे. परिसरात गुलाब, शेवंती या फुलांच्या बागा बहरू लागल्या आहेत. गेल्या दोन वर्षांपासून बोर्डेक्स वाणाच्या गुलाबाने मार्केटमध्ये चांगला भाव खाल्ला आहे. या गुलाबाची लागवड अनेकांनी केली आहे. याशिवाय शेवंतीच्या लागवडीकडेही काही शेतकरी वळले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

