मंडळांनी साक्षरतेचा वसा घ्यावा
काटेवाडी, ता. २५ : गणेशोत्सव हा केवळ उत्सव नाही, तर सामाजिक प्रबोधनाची संधी आहे. राज्यातील १.६३ कोटी असाक्षरांचे जीवन उजळवण्यासाठी गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन शिक्षण सहसंचालक राजेश क्षीरसागर यांनी केले आहे. केंद्र शासनाच्या ‘उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम’ अंतर्गत दोन वर्षांत १० लाख लोकांना साक्षर केले. पण ही गती दहापट वाढवण्यासाठी गणेश मंडळांनी साक्षरता चळवळीला हातभार लावावा, अशी अपेक्षा शिक्षण विभागाने व्यक्त केली.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने सामाजिक जागृतीचे मंच म्हणून मंडळांनी साक्षरता चळवळीला गती द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राज्यात गणेशोत्सव हा उत्साह आणि भक्तीचा उत्सव आहे. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला हा सार्वजनिक उत्सव आजही सामाजिक एकजुटीचे प्रतीक आहे. राज्यात २ लाखांहून अधिक गणेश मंडळे दरवर्षी उत्सव साजरा करतात. हीच ऊर्जा आता साक्षरता प्रसारासाठी वापरली जावी, असे मत क्षीरसागर यांनी मांडले. ते म्हणाले, ‘‘गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सोहळा नसून, सामूहिक चेतनेचा उत्सव आहे. व्यसनमुक्ती, पर्यावरण रक्षण यांसारख्या चळवळींप्रमाणे आता साक्षरता ही मंडळांची नवी जबाबदारी ठरावी,’’ साक्षरता उपक्रमात सहभागी होण्यासाठी गणेश मंडळांनी स्थानिक शिक्षण विभागाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
केंद्राची ‘उल्लास’ योजना आणि महाराष्ट्र
केंद्र शासनाच्या “उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम” अंतर्गत २०२२-२७ या कालावधीत देशभरातील असाक्षरता निर्मूलनाचे ध्येय ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्रात २०२३-२४ पासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली असून, मागील दोन वर्षांत १० लाख लोकांना साक्षर करण्यात यश आले आहे. मात्र, २०११ च्या जनगणनेनुसार राज्यातील १.६३ कोटी असाक्षरांच्या तुलनेत ही प्रगती अपुरी आहे. यामुळे साक्षरता चळवळीला व्यापक जनचळवळीचे स्वरूप देण्याची गरज आहे.
गणेश मंडळांसाठी ठोस उपाययोजना
क्षीरसागर यांनी गणेश मंडळांना साक्षरता प्रसारासाठी काही ठोस उपाययोजना सुचविल्या आहेत. यामध्ये साक्षरता प्रबोधन शिबिरे, मंडपात साक्षरता कोपरा, भित्तिपत्रके, प्रदर्शने, नाटिका, गीत, नृत्य यांसारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे जनजागृती, डिजिटल साक्षरता शिबिरे, साक्षरता संकल्प विधी, साक्षरता दान पेटी आणि ‘एक मंडळ-दहा साक्षर’ अभियानाचा समावेश आहे. या अंतर्गत किमान एका मंडळांनी १० असाक्षर व्यक्तींना साक्षर करावे.
शिक्षण संचालनालयाने गेल्या वर्षीपासून ‘यंदाचा गणेशोत्सव साजरा करू उल्लासच्या संगे!’ हा उपक्रम सुरू केला आहे. यंदा सर्व गणेश मंडळांनी या चळवळीत सहभागी व्हावे, अशी अपेक्षा आहे. ‘गणपती बाप्पा मोरया असाक्षरतेचा नाश होवो, साक्षरतेचा प्रकाश होवो!’ हा जयघोष यंदाच्या गणेशोत्सवाचा मंत्र ठरावा.
- राजेश क्षीरसागर, शिक्षण सहसंचालक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.