खानापुरात राजगड कारखान्याच्या ऊस लागवड कार्यक्रमाचा प्रारंभ
हिर्डोशी, ता.२५ : खानापूर (ता.भोर) येथे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन राजगड सहकारी साखर कारखाना ऊस लागवड विकास कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.
कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते गुरुवारी (ता. २३) जितेंद्र भरत पोळ व शिवाजी रामभाऊ थोपटे या शेतकऱ्यांना शेतात
को ८६. ०३२ या वाणाच्या उसाच्या बियाणांची लागवड करण्यात आली.
कारखान्याचा पुढील गाळप हंगाम व्यवस्थितरीत्या सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी कारखान्याच्या माध्यमातून कार्यक्षेत्रात अधिकाधिक प्रमाणात ऊस लागवड करण्याचे नियोजन केले आहे. शेतकऱ्यांना ऊस लागवड करण्याचे आवाहन केल्या प्रमाणे उसाचे बियाणे राजगड सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर उपलब्ध करून देत आहोत. त्याचबरोबर कारखान्याच्या वतीने उसासाठी लागणारी खतेही टप्प्याटप्प्याने उपलब्ध करण्यात येणार आहेत. तसेच शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानही उपलब्ध करून देणार असल्याचे थोपटे यांनी याप्रसंगी सांगितले.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष पोपटराव सुके, संचालक उत्तम थोपटे, सुभाष कोंढाळकर, सुधीर खोपडे, अरविंद सोंडकर, अनिल सावले, अतुल किंद्रे, अमर बुदगुडे, संदीप नांगरे, मधुकर कानडे, राजेंद्र शेटे, पोपटराव मालुसरे आदींसह भागातील विविध गावातील ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

