भोर तालुक्यातील भात पीके भुईसपाट
विलास मादगुडे ः सकाळ वृत्तसेवा
हिर्डोशी, ता. ५ : भोर तालुक्यात मागील काही दिवसांपासून सतत पडत असलेल्या पावसाने रविवारी (ता. २) उघडीप दिल्याने भात काढणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र, अवकाळी पावसामुळे भात पिकासह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सततच्या पावसाने व रोगाच्या प्रादुर्भावामुळे भाताच्या उत्पादनात घट होणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
तालुक्यात ७५०० हेक्टर क्षेत्रापैकी ७४६० क्षेत्रावर भात पेरणी झाली. ऑक्टोबर महिन्यात ८७ असलेल्या सरासरी पैकी ३७.२ म्हणजेच ४२.४ टक्के पाऊस पडला आहे. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात सततच्या वाऱ्यासह पावसामुळे हाळवी भात पिके आडवी पडून काही प्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीची वेळ निघून गेल्याने लोंब्यातून झडून गेलेल्या परिपक्व पिकांचे व भिजल्याने जनावरांचे खाद्य असलेल्या पेंढ्याचे नुकसान झाले.
सध्या पावसाने उघडीप दिल्याने भात काढणीला वेग आला असला तरी ढगाळ हवामानामुळे कापणी केलेल्या भाताचे भारे बांधून सुरक्षीत ठिकाणी नेहून मशिनच्या साहाय्याने लागलीच मळणी केली जात आहे. त्यामुळे मळणी केलेले भात ताडपत्रीवर टाकून वाळवावे लागत आहे. तसेच, पाणी असलेल्या खाचरातील भात काढणी लांबत आहे. याशिवाय सततच्या पावसाने सोयाबीन आणि भुईमूग पिकांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळाला नसल्याने, तसेच काढणी दरम्यान पडलेल्या पावसाने उत्पादन घट झाली आहे.
नसरापूर विभागाच्या रोपवाटिकेतील कांदा रोपांना पावसाचा फटका बसला आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू असून, ८५०० रुपये प्रति हेक्टर आणि कमीत कमी एक हजार रुपये प्रमाणे जिरायती पिकांसाठी भरपाई मिळणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांचे फार्मर आयडी असणे गरजेचे असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
पावसाने विश्रांती घेतली असल्याने भात पिकाची तातडीने कापणी व मळणी करावी. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून त्याचा अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात येत आहे. रब्बी पिकांसाठी पुरेसा वापसा असून, शेतकऱ्यांनी जैविक व रासायनिक बीज प्रक्रिया करून वेळेत पेरणी करावी. सततचा पाऊस आणि आद्रता असून, पिकाची काळजी घेताना कृषी विभागाच्या सल्ल्याने औषध फवारणी करावी.
- शरद धर्माधिकारी, तालुका कृषी अधिकारी, भोर
यावर्षी मे महिन्यापासून पाऊस सुरू झाला. अनेक अडचणींना सामोरे जाऊन भात पिकाची काळजी घेतली. मात्र, काढणीआधीच करप्या रोगाचा प्रादुर्भाव व आठवडाभर पडलेल्या पावसाने भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. गतवर्षीपेक्षा यावर्षी उत्पादनात मोठी घट होणार आहे.
- भीमाजी दानवले, शेतकरी, बारे बुद्रुक
मे महिना (३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान)
बाधित शेतकरी - ४९९
जिरायती - ९२.९९ हेक्टर
बागायती - २४.२२ हेक्टर
फळ पिके - १३.४७ हेक्टर
एकूण बाधित क्षेत्र- १३०. ६८ हेक्टर
मदत - १५.०५ लाख
सप्टेंबरमधील नुकसान
बाधित शेतकरी - ४५६
जिरायती - १२०.६३ हेक्टर
एकूण बाधित क्षेत्र- १२०.६३ हेक्टर
मदत - १०.२५ लाख
ऑक्टोबर महिन्याचे नुकसान (३३ टक्के पेक्षा जास्त)
मंडल - एकूण क्षेत्र हे. बाधित क्षेत्र हे. टक्केवारी
भोर १- २८६५ -३८.००-१.३
भोर २- २५४० - ३२.००-१.२
नसरापूर- १९९५ - ०२.२४- ०.१
02743
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

