
तंत्रज्ञानाद्वारे उसाचे एकरी उत्पादन वाढवा
नारायणगाव, ता.१२ : ''''शेतकऱ्यांनी प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करून उसाचे एकरी उत्पादन वाढण्यासाठी प्रयत्न करावा. खोडवा ऊस उत्पादन वाढीसाठीसुद्धा प्रयत्न करणे आवश्यक आहे,'' असे मत भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.
कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने कृषी महोत्सवानिमित्त ९ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान विविध पिकांविषयी कृषी परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त उसाचे सुधारित उत्पादन तंत्रज्ञान व खोडवा व्यवस्थापन या परिसंवादात भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे निवृत्त ऊस शास्त्रज्ञ डॉ.आबासाहेब साळुंखे,कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. प्रशांत शेटे, ग्रामोन्नती मंडळाचे कार्यवाह रवींद्र पारगावकर, संचालक अरविंद मेहेर, शेतकी अधिकारी सचिन पाटील, कुरकुटे , संदीप जाधव, दिनकर आदक, संदीप मोरडे आदी उपस्थित होते.
वळसे पाटील पुढे म्हणाले, की ऊस उत्पादन वाढीसाठी भीमाशंकर आणि विघ्नहर सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांना दर्जेदार उसाचे बियाणे पुरवठा करतात, शेतकऱ्यांना प्रशिक्षण देतात. हिरवळीचे खते, बियाणे, ठिबक सिंचन साठी अर्थसहाय्य, माती परीक्षण, उसाची रोपवाटिकांसोबत करार, जैवक संजिवकांचा पुरवठा, आदीचा शेतकऱ्यांना पुरवठा करतात.हुमनी नियंत्रनासाठी भुंगेरे गोळा करण्याचा उपक्रम राबवण्यात आला. उसाला चांगला दर मिळत आहे परंतु ऊस उत्पादन वाढले पाहिजे.खोडवा ऊस उत्पादनावरती काम करणे गरजेचे आहे.
प्रा.राहुल घाडगे यांनी सूत्रसंचालन केले.
ऊस शेतीमध्ये खोलवर मशागत फायदेशीर आहे. क्षारयुक्त जमीन नियंत्रणात आणण्यासाठी सब सोईलर वापरणे फायदेशीर. जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी सेंद्रिय पदार्थ वापर वाढवला पाहिजे.
- डॉ.आबासाहेब साळुंखे, ऊस शास्त्रज्ञ
03346