जुन्नरमध्ये सोयाबीनच्या उत्पादनात घट

जुन्नरमध्ये सोयाबीनच्या उत्पादनात घट

Published on

नारायणगाव, ता. ८ : सततच्या पावसामुळे यंदा सोयाबीन उत्पादकांना फटका बसला आहे. उत्पादनात सुमारे ३० ते ४० टक्के घट झाली आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री सुरू केली आहे. मात्र, बाजारभाव नसल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. सोयाबीनला किमान ५० रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळावा, अशी मागणी जुन्नर तालुक्यातील उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.
सततच्या पावसामुळे तालुक्यातील काही भागात सोयाबीनचे पीक शेतात काळे पडले आहे. शेंगांना मोड आले आहेत. या नुकसानीचे कृषी व महसूल विभागाने पंचनामे करावेत. बाजार समितीने सोयाबीन खरेदी विक्री केंद्र सुरू करावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद खांडगे यांनी केली आहे.
जुन्नर तालुक्यात यावर्षी सरासरी सुमारे साडेसहाशे मिलिमीटर पाऊस झाला आहे. सोयाबीन पिकाच्या शेंगा परिपक्व होण्याच्या अवस्थेत सप्टेंबर महिन्यात मुसळधार पाऊस झाला. सोयाबीनचे उभे पीक पाण्यात राहिल्याने काळे पडले आहे. सोयाबीनच्या शेंगाना मोड आले आहेत. पावसाचा जास्त फटका प्रामुख्याने जून महिन्यात पेरणी झालेल्या सोयाबीन पिकाला बसला आहे. जुलै महिन्यात उशिरा पेरणी झालेल्या सोयाबीनचे नुकसानीचे प्रमाण कमी आहे. जुन्नर तालुक्यात यावर्षी तेरा हजार पाचशे हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी झाली होती. शेतीची मशागत, बियाणे, रासायनिक खते, काढणी, मळणी आदींसाठी एकरी सुमारे तीस हजार रुपये खर्च होत आहे. सोयाबीनचे एकरी उत्पादन १ हजार ३०० किलोग्रॅम (दीड टन) निघणे अपेक्षित असताना एकरी ७०० ते ८०० किलोग्रॅम उत्पादन निघत आहे. सध्या सोयाबीनला प्रतिकिलोग्रॅम ४० रुपये ते ४१ रुपये बाजारभाव मिळत आहे. सध्याच्या बाजारभावात जेमतेम भांडवली खर्च वसूल होत आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री सुरू केली आहे. मात्र, सोयाबीनला भाव नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

सततचा पाऊस व अतिवृष्टी यामुळे सोयाबीन सह भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. द्राक्षाच्या घडनिर्मितीवर सुद्धा परिणाम झाला आहे. मात्र महसूल व कृषी विभागाने तालुक्याच्या मध्यभागातील नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे केले नाहीत.
- राजेंद्र वाजगे, शेतकरी नारायणगाव


सोयाबीन पिकाचे सरसकट पंचनामे केले नाहीत. नुकसान झाले असल्यास शेतकऱ्यांनी आपल्या भागातील तलाठी कार्यालयात माहिती दिल्यास पंचनामे केली जातील.
- शीतल गर्जे, मंडलाधिकारी, नारायणगाव

सोयाबीन खरेदी विक्री केंद्र सुरू करण्यासाठी बाजार समितीने परवानगीसाठी शासनाकडे फेर प्रस्ताव पाठवला आहे. मात्र अद्याप परवानगी न मिळाल्याने बाजार समिती आवारात सोयाबीन खरेदी विक्री केंद्र सुरू करता आले नाही.
- रूपेश कवडे, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर

07304

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com