जुन्नरमधील द्राक्ष बागांचे पंचनामे सुरू

जुन्नरमधील द्राक्ष बागांचे पंचनामे सुरू

Published on

नारायणगाव, ता. १९ : जुन्नर तालुक्यातील द्राक्ष बागांचे पंचनामे करण्याचे काम करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. घडनिर्मिती न झालेल्या व अल्प प्रमाणात घडनिर्मिती झालेल्या द्राक्ष बागांचे पंचनामे करावेत, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली होती.
उपविभागीय कृषी अधिकारी सतीश शिरसाठ, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. सहदेव रामटेके, केव्हीकेचे शास्त्रज्ञ डॉ. भरत टेमकर, डॉ. दत्तात्रेय गावडे, तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यांच्या पथकाने शुक्रवारी (ता. १७) द्राक्ष बागांची पाहणी करून जिल्हाधिकारी यांना अहवाल सादर केला. त्यानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी द्राक्ष बागांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले.
पंचायत समिती व तालुका कृषी अधिकारी विभागाच्या वतीने जुन्नरमधील द्राक्ष बागांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू केल्याची माहिती तहसीलदार डॉ. सुनील शेळके यांनी दिली.
सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला छाटणी झालेल्या बहुतेक द्राक्ष बागांमध्ये घड निर्मिती न झाल्याने तालुक्यातील ७० ते ८० टक्के द्राक्ष उत्पादकांचा हंगाम वाया जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मात्र, पंचनामा करण्यास कृषी विभागाने नकार दिला होता. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या द्राक्ष बागांच्या नुकसानी संदर्भात ‘सकाळ’ने सातत्याने पाठपुरावा केला. या संदर्भात माजी आमदार अतुल बेनके यांनी दखल घेऊन द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांनी तातडीने द्राक्ष बागांची पाहणी करून अहवाल सादर करावा. त्यानंतर पंचनामा करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी निर्णय घ्यावा, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

द्राक्ष बागांच्या नुकसानी संदर्भात ‘सकाळ’च्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा झाला. सकाळमधील बातम्यांची दखल घेऊन माजी आमदार अतुल बेनके यांच्या पुढाकारातून उपमुख्यमंत्री पवार यांची भेट झाली. त्यानंतर शासकीय यंत्रणा गतिमान होऊन द्राक्ष बागांची पाहणी होऊन पंचनाम्याचे आदेश निघाले.
- अवधूत बारवे, द्राक्ष उत्पादक शेतकरी, नारायणगाव

हंगाम वाया जाणार असल्याने द्राक्ष बागांच्या संगोपनासाठी वर्षभर केलेला एकरी तीन लाख रुपये खर्च वाया जाणार आहे. शासनाकडून एकरी नऊ हजार रुपये अनुदान मिळणार आहे. झालेल्या भांडवली खर्चाचा विचार करता शासनाकडून मिळणारे अनुदान म्हणजे चेष्टा आहे.
- गुलाबराव नेहरकर, द्राक्ष उत्पादक शेतकरी, येडगाव

एकरी नऊ हजार रुपये प्रमाणे जास्तीत जास्त तीन हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष बागांना अनुदान मिळू शकते. तालुक्यात एक हजार ११६ हेक्टर क्षेत्रात द्राक्ष बागा आहेत. शासकीय नियमानुसार सुमारे अडीच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
- गणेश भोसले, तालुका कृषी अधिकारी

07365

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com