रब्बी हंगामासाठी दिलासा
नारायणगाव, ता. ११ : कुकडी प्रकल्पांतर्गत येडगाव धरणातून वरिष्ठांच्या आदेशानुसार रब्बी हंगामासाठी २० डिसेंबर ते २५ डिसेंबर २०२५ दरम्यान आवर्तन सुरू करण्याचे नियोजन केले आहे. रब्बीच्या पहिल्या आवर्तनात कुकडी डावा कालव्यात सुमारे चार टीएमसी, तर उर्वरित इतर कालव्यात सुमारे अडीच टीएमसी, असे एकूण साडेसहा टीएमसी पाणी शेती सिंचनासाठी सोडण्याचे नियोजन आहे, अशी माहिती कुकडी पाटबंधारे विभाग क्र. १चे कार्यकारी अभियंता जे.बी. नान्नोर यांनी दिली.
कुकडी प्रकल्पाच्या रब्बी आवर्तनाच्या नियोजनासाठी ६ नोव्हेंबर रोजी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अहिल्यानगर येथे बैठकीचे नियोजन केले होते. मात्र, ही बैठक अचानक रद्द झाली. त्यानंतर नगर परिषद निवडणूक आचारसंहिता व सध्या सुरू असलेले हिवाळी अधिवेशनामुळे कालवा सल्लागार समितीची बैठक लांबली. त्यामुळे रब्बीच्या पहिल्या आवर्तनाला उशीर झाला आहे.
कुकडी प्रकल्पाअंतर्गत लाभ क्षेत्रातील जुन्नर, शिरूर, पारनेर ,कर्जत, करमाळा, श्रीगोंदा या तालुक्यात गहू, कांदा, ऊस या रब्बी हंगामातील प्रमुख पिकांसह इतर भाजीपाला पिकांच्या लागवडीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. या पिकांना पाण्याची टंचाई निर्माण होऊ लागल्याने रब्बीचे आवर्तन तातडीने सोडावे, अशी मागणी शेतकरी, लोकप्रतिनिधी मागील १५ दिवसांपासून कुकडी पाटबंधारे विभागाकडे करत आहेत. माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी डिंभे उजवा व घोड शाखा कालव्यात आवर्तन सुरू करण्याची मागणी केली आहे. पारनेरचे आमदार काशिनाथ दाते यांनी कांदा लागवडीसाठी कुकडी डावा कालव्यात तातडीने आवर्तन सोडण्याची मागणी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे. त्यानंतर जलसंपदामंत्री विखे पाटील यांनी अधीक्षक अभियंता अलका अहिरराव यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून आवर्तन सोडण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार कालवा दुरुस्तीची सुरू असलेली कामे २० डिसेंबरपर्यंत पूर्ण करून त्यानंतर आढावा घेऊन आवर्तन सोडले जाईल, असे अधीक्षक अभियंता अहिरराव यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आवर्तनाचा विषय मार्गी लागला आहे.
समाधानकारक पाणीसाठा
कुकडी प्रकल्पात आजअखेर २७.४८ टीएमसी (९२.६० टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी आजअखेर प्रकल्पात २५.४९ टीएमसी (८५.९२ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला होता. मागील चार वर्षाचा आढावा घेता व गतवर्षाच्या तुलनेत यावर्षी कुकडी प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा झाला आहे.
सध्या कुकडी डावा कालव्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. या कामाचा आढावा घेऊन वरिष्ठांच्या आदेशानुसार कुकडी डावा कालव्यात २० डिसेंबर ते २५ डिसेंबर दरम्यान आवर्तन सुरू करण्याचे नियोजन केले आहे. इतर कालव्यात मागणीनुसार पाणी सोडण्यात येईल. सुमारे ३५ दिवसाच्या रब्बीच्या पहिल्या आवर्तनासाठी साडेसहा टीएमसी पाण्याचा वापर होणार आहे.
- जे. बी. नान्नोर, कार्यकारी अभियंता, कुकडी पाटबंधारे विभाग क्र. १
धरणनिहाय आजअखेरचा उपयुक्त पाणीसाठा टीएमसीत व कंसात टक्केवारी : येडगाव : १.९४ टीएमसी (१०० टक्के), माणिकडोह : ८.३६ टीएमसी (८२.१९ टक्के), वडज : १.१५ टीएमसी (९८.५३ टक्के), पिंपळगाव जोगे : ३.५३ टीएमसी (९०.८१ टक्के), डिंभे : १२.४८ टीएमसी( ९९.८९ टक्के).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

