वारुळवाडीला प्रथमच ऐन हिवाळ्यात पाणी टंचाई

वारुळवाडीला प्रथमच ऐन हिवाळ्यात पाणी टंचाई

Published on

नारायणगाव, ता. १३ : ‘‘वारूळवाडी परिसराला पाणीपुरवठा करणारी डेरेमळा येथील ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक विहिरीची पाणीपातळी अचानक कमी झाल्याने वारुळवाडी परिसराला प्रथमच ऐन हिवाळ्यात पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी सामाजिक जाणीव ठेवून स्थानिक शेतकरी राजेंद्र तात्याबा डेरे यांनी आपल्या विहिरीतील पाणी ग्रामपंचायतच्या विहिरीत सोडल्याने पाणीटंचाईवर तात्पुरती मात केली आहे,’’ अशी माहिती सरपंच विनायक भुजबळ, माजी सरपंच जंगल कोल्हे यांनी दिली.

डेरेमळा येथील ओढ्यालगत असलेल्या विहिरीतून वारूळवाडी परिसरातील साने वस्ती, आनंदवाडी, अभंग वस्ती, ठाकरवाडी, कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर या भागाला पाणीपुरवठा केला जातो. या विहिरीतील पाणी आनंदवाडी व ठाकरवाडी येथील पाण्याच्या टाकीत सोडले जाते. त्यानंतर रोज सकाळी नळ पाणीपुरवठा केला जातो.
या परिसरात वास्तव्यास येणाऱ्यां‍ची संख्या जास्त आहे. परिसराची लोकसंख्या सुमारे वीस हजार आहे. माणसी ५० हजार लिटर प्रमाणे रोज सुमारे किमान दहा लाख लिटर पाण्याची गरज असते. विहिरीच्या दक्षिण बाजूकडून डिंभे डाव्या कालवा गेलेला आहे. या कालव्याचे पाणी ओढ्याला येत असल्याने यापूर्वी पाणी टंचाई समस्या जाणवली नाही. मात्र यावर्षी प्रथमच रब्बीचे आवर्तन लांबले असून डिंभे डावा कालव्याला पाणी न सोडल्याने ग्रामपंचायतीच्या विहिरीची पाणी पातळी मागील दोन दिवसांपासून अचानक कमी झाली. पाणी उपसा झाल्यानंतर विहीर कोरडी पडत असल्याने पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर सरपंच भुजबळ, माजी सरपंच कोल्हे, पोलिस पाटील सुशांत भुजबळ यांनी येथील शेतकरी राजेंद्र डेरे त्यांच्या शेतीसाठी असलेल्या विहिरीतील पाणी देण्याची विनंती केली. सामाजिक जाणिवेतून त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात त्यांच्या विहिरीतील पाणी ग्रामपंचायतच्या विहिरीमध्ये शनिवारी (ता. १३) दुपारी सोडले. यामुळे नागरिकांची तात्पुरती पाण्याची व्यवस्था झाली आहे.

डिंभे डाव्या कालव्यात पाणी सोडण्याची मागणी
वारूळवाडी परिसराची लोकसंख्या झपाट्याने वाढल्याने पाण्याची मागणी वाढली आहे. डिंभे डाव्या कालव्याला यावर्षी अद्याप पाणी सोडले नाही. यामुळे येथील ओढा कोरडा पडल्याने ग्रामपंचायतीच्या विहिरीसह परिसरातील शेतकऱ्यांच्या विहीर व विंधन विहिरी यांची पाणी पातळी खालावली आहे. डिंभे डाव्या कालव्यात तातडीने पाणी सोडावे, अशी मागणी कुकडी पाटबंधारे विभागाकडे ग्रामपंचायतीच्या वतीने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com