रसायनमिश्रित पाण्यामुळे आरोग्यावर परिणाम

रसायनमिश्रित पाण्यामुळे आरोग्यावर परिणाम

Published on

खेड शिवापूर, ता. ३० ः खोपी (ता. भोर) येथील शोगिनी कंपनीमधून सोडल्या जाणाऱ्या रसायनमिश्रित पाण्याने परिसरातील ओढे नाले, नदी व शेती प्रदूषित होत असून, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे.
शेतीमधील उत्पादनही प्रभावित होऊन शेतीचे नुकसान होत असल्याची तक्रार नवविकास युवक शेतकरी संघटनेने केली असून, या बाबत तहसीलदार ते जिल्हाधिकारी या सर्व अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. या कंपनीवर पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे.
नवविकास शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब पवार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खेड शिवापूर गावच्या हद्दीत महामार्गालगत असलेल्या शोगिनी कंपनीमधून केमिकलयुक्त विषारी सांडपाणी शेजारील ओढ्यात सोडले जाते. त्यामुळे शेतीसह पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे. हे रसायनयुक्त पाणी ओढ्याला मिळून पुढे शिवगंगा नदीला जाऊन मिळते. या नदीकाठावर खोपी गावासह अनेक गावच्या पाणी योजनांच्या विहिरी आहेत. त्या प्रदूषित होत आहेत. शिवगंगा नदीमधून हे पाणी पुढे शिवरे, वरवे कांजळे, केळवडे, नसरापूरपर्यंत जात आहे.
मागील पाच ते सहा महिन्यात अनेकवेळा कंपनीने त्यांच्या आवारातील प्रदूषित पाणी ओढ्यात सोडले आहे. शेतकऱ्यांच्या शिवारात हे पाणी येऊन पिकांचे नुकसान झाले आहे. या बाबत मी स्वतः व शेतकरी पुंडलिक पवार यांनी कंपनीच्या व्यवस्थापकांकडे तक्रार केली आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले गेले. एप्रिल- मे महिन्यात अतिवृष्टीचा फायदा घेत कंपनीने पावसाच्या पाण्याबरोबर हे प्रदूषित पाणी ओढ्यात सोडले. यावेळी ओढ्यात सर्वत्र रसायनाचा फेस तरंगत होता. या बाबत कंपनी कोणतीही खबरदारी घेत नसल्याने जिल्हाधिकारी यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांकडे ओढ्यातील फेस आलेल्या पाण्याच्या फोटोसह व पाण्याच्या तपासणी अहवालासह तक्रार अर्ज केले आहेत. या कंपनीची प्रशासन व प्रदूषण नियंत्रण महामंडळाने त्वरित पाहणी करावी, कंपनीवर पर्यावरण संरक्षम कायद्यानुसार कारवाई व्हावी, भविष्यात पुन्हा केमिकल युक्त पाणी सोडले जाऊ नये यांची हमी घ्यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.

केमिकलयुक्त वाहणाऱ्या पाण्याची तपासणी पाँलिटेस्ट लँब्रोटरीज या स्वतंत्र प्रयोगशाळेत केली असून, त्याचा अहवाल अत्यंत चिंताजनक आहे. या पाण्यात सल्फेट व क्लोराईड हे घटक मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात असून, हे पाणी शेती, पर्यावरण व मानवी आरोग्यास अत्यंत घातक आहे.
- दादासाहेब पवार, अध्यक्ष, नवविकास शेतकरी संघटना

कंपनीकडून कोणतेही पाणी आवाराच्या बाहेर सोडले जात नाही. कंपनीमध्ये झेडएलडी सारखे प्रकल्प असून, त्यामधून पाणी प्रक्रिया होते. एक थेंबही पाणी बाहेर जात नाही. कंपनीमध्ये शासनाच्या विविध एजन्सी, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या नियमित भेटी होतात व ज्या व्यक्तीने तक्रार केली आहे ते सातत्याने अशा तक्रारी करत असतात. त्या खोट्या आहेत.
- शैलेश पाटणकर, व्यवस्थापक, शोगिनी कंपनी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com