
ओतूर, ता. १२ : कांद्याला सध्या मिळत असलेल्या निच्चांकी बाजारभावामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. चांगला बाजारभाव मिळेल, या आशेने चाळीत साठवणूक केलेल्या कांद्यास अपेक्षित बाजारभाव मिळतच नाही. खराब हवामानामुळे साठवणूक केलेल्या कांद्याचे खराब होण्याचे व त्यास मोड येण्याचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे कांदा कमी बाजारभावात विक्री करावा लागत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक आर्थिक अडचणीत सापडला आहे.
जुन्नर तालुक्यातील यावर्षी एप्रिल ते मे महिन्यात काढणी केलेल्या चांगल्या कांद्याचे दर १५ ते १७ रुपये किलो होते. तोच कांदा सहा महिने चाळीत साठवणूक करून आता शेतकरी साठवणूक केलेला कांदा बाजारात विक्रीसाठी आणला असता त्यास ८ ते १० रुपये किलोला दर मिळत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. एक एकर कांदा उत्पादन करून चाळीत साठवणूक करून परत विक्री करेपर्यंत कांद्याला अंदाजे एक लाख रुपयांपर्यंत खर्च येत असून चालू कांदा दराने एक एकर कांद्याचे ५० हजार रुपये सुद्धा होत नाही. त्यामुळे सरकारने कांदा उत्पादक शेतकरी वाचवण्यासाठी चाळीत साठवणूक केलेल्या कांद्याला ६० रुपये हमीभाव जाहीर करावा, अशी मागणी
अनेक शेतकऱ्यांसह अर्जुन अमुप यांनी केली आहे.
ओतूर कृषी मंडल अंतर्गत येणाऱ्या ओतूर, उदापूर, डिंगोरे, पिंपळगावजोगा, ठिकेकरवाडी, माळवाडी, नेतवड, रोहोकडी, डुंबरवाडी व परिसरातील इतर गावांमध्ये उन्हाळी कांद्याचे उच्च प्रतीचे उत्पादन घेतले जाते. ओतूर कृषी मंडल कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या या गावामध्ये पूना फुरसुंगी व कनेरसर या उन्हाळी कांदा जातीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. पूना फुरसुंगी व कनेरसर या कांदा वाणाचे उत्पादन दर्जेदार व टिकाऊपणा जास्त असल्यामुळे शेतकरी कांदे काढणी नंतर त्वरित कांदे न विकता चाळीत कांदा साठवणूक करून योग्य बाजारभावाची वाट पाहतात.
पाच वर्षांपूर्वी एक एकर कांदा उत्पादन करण्यासाठी चाळीस ते पन्नास हजार रुपये खर्च येत होता. तो आता एक लाखाच्या पुढे होत आहे. बाजारभाव मात्र तोच आठ ते दहा रुपये मिळत आहे तरी सरकारने ओल्या कांद्याला किलोला ३० रुपये व चाळीत साठवणूक केलेल्या कांद्याला ५० ते ६० रुपये हमीभाव जाहीर करावा अशी मागणी सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यातर्फे त्यांनी केली आहे.
- प्रभाकर शिंदे, कांदा उत्पादक
प्रतिकिलोला ५० रुपयाने कांदा खरेदी करा
माजी जिल्हा परिषद सदस्य व प्रगतशील शेतकरी अंकुश आमले म्हणाले की, केंद्र सरकारच्या निर्यातीच्या धरसोड धोरणामुळे कांद्याचे बाजारभाव पडले आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला .आहे सरकारने या वर्षी विक्री झालेल्या कांद्याला किलोला दहा रुपये अनुदान जाहीर करावे. तसेच कांद्याचे चालू बाजारभाव वाढवण्यासाठी नाफेडतर्फे किंवा स्वतंत्र यंत्रणा वापरून शेतकऱ्यांकडून किलोला ५० रुपये दराने कांदा खरेदी करावा.त्यामुळे कांद्याचे चालू बाजारभाव वाढून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च तरी मिळेल.
00750
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.